| माथेरान | वार्ताहर|
सनियंत्रण समिती ई-रिक्षाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करीत नसल्याने माथेरान श्रमिक हातरीक्षा संघटनेकडून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.दि.16 ऑक्टोबरपासून हातरीक्षा बंद करून दि.19 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन यावेळी श्रमिक हातरीक्षा चालक मालक संघटने मार्फत देण्यात आले आहे. पर्यटनस्थळ माथेरान साठी ई-रिक्षा हि एक वरदान ठरली होती. येथील शालेय विद्यार्थी, ज्येेष्ठ नागरिक तर दिव्यांगांसाठी येथे येणाऱ्या वयोवृद्ध पर्यटक या सर्वांसाठी ई-रिक्षा खूपच फायदेशीर ठरली होती. ई-रिक्षाचा 5 डिसेंबर ते 5 मार्च असा तीन महिन्यांचा पायलेट प्रोजेक्ट पूर्ण झाल्या नंतर ई-रिक्षा सर्वांसाठी सुरळीत सुरू होईल असे येथे सगळ्यांना वाटत होते.
मात्र सनियंत्रण समितीच्या आढमूठ्या भूमिकेमुळे व पायलेट प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर पुढील एक महिन्या च्या आत ई-रिक्षा कश्या पद्धतीने सुरू करणार याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सनियंत्रण समितीने सर्वोच्च न्यायालयात सादर करणे आवश्यक होते.मात्र आत्ता येथे सात महिने होऊन देखील अहवाल सादर केला नाही.पुढील तीन दिवसांत सनियंत्रण समितीने येथे अहवाल सादर केला नाही तर दि.16 रोजी माथेरान शहरात श्रमिक हातरिक्षा चालक मालक संघटनेकडून हातरिक्षा बंद ठेवणार असल्याचे निवेदन सादर केले आहे. तर दि.19 पासून आमरण उपोषणाचा इशारा देखील यावेळी संघटनेकडून येथे देण्यात आला आहे. निवेदन सादर करते वेळी श्रमिक हातरीक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल,उपाध्यक्ष प्रकाश सुतार सचिव सुनिल शिंदे यांच्यासह श्रमिक हातरिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.







