। पेण । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील वाशी-सरेभाग येथील रस्त्याच्या कामाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे येथील शेकडो एकर पिकती शेतजमीन पाण्याखाली जाण्याची भीती आहे. या रस्त्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतनू 2018 सालीच निधी मंजूर झाला आहे. परंतु, मागील तीन वर्षांत 50 टक्केदेखील काम पूर्ण झालेले नाही. संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराच्या संगनमताने निधीचा अपव्यय झाला आहे. मात्र, याविषयी अधिकार्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. वाशी- सरेभाग येथील 4560-00 मीटरच्या रस्त्यालगत बांधासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून 728.76 लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामाची सुरुवात 18 एप्रिल 2018 रोजी करण्यात आली. पाच वर्षात काम हे पूर्ण करायचे आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत 50 टक्केही काम पूर्ण झालेले नाही. जे काम झाले आहे, ते रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, अधिकारी वर्ग आणि ठेकेदार यांनी संगनमताने या रस्त्याच्या निधीचा अपव्यय केला आहे. मे 2021 मध्ये भरतीच्या पाण्यानेच हा रस्ता खचला होता, त्यावेळेला स्थानिक जिल्हा परिषद लोकप्रतिनिधी प्रभाकर म्हात्रे यांनी स्वखर्चातून बांधला होता. त्यावेळेला देखील ठेकेदार व अधिकारी यांच्यावर स्थानिक ग्रामस्थांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा ठपका ठेवला होता. कार्यकारी अभियंता डी.बी. परदेशी आणि उपअभियंता अनंत गोरे हे स्थानिकांना उडवून लावत असत. या रस्त्याचे काम व्ही.एस. पाटील नामक कंपनी करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच बांधाला तडा गेल्याने शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी, लावलेली भातशेती नापीक होणार आहे. येथील वडिलोपार्जित जमीन शेतकर्यांच्या पोटापाण्यासाठी उपयुक्त आहे. मात्र, या घटनेमुळे आलेले पीक वाया जाऊन हजारो कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती नाकारता येणार नाही. बांधामुळे समुद्राचे खारे पाणी या भागातून वाशी, बोरी, शिर्की, वडखळपर्यंत जाऊन तेथील जमीन नापीक होऊ शकते. किंबहुना घरेही उद्ध्वस्त होऊ शकतात. याची सर्वस्वी जबाबदारी ही अधिकारी डी.बी. परदेशी व अनंत गोरे तसेच ठेकेदार व्ही.एस.पाटील यांची सामूहिक असेल.
अभियंत्यांची सारवासारव
कनिष्ठ अभियंता ग्रामसडक योजना योगेश मोकल हे फक्त सारवा सारव करत आहेत. खरी परिस्थिती त्यांनाही माहीत आहे; परंतु वरिष्ठांच्या धाकामुळे तोंड उघडायला तयार नाहीत, एवढे नक्की. आत्ता ते सांगतात की, वाशी-सरेभाग येथील पडलेल्या बांधाची ठेकेदारासह तात्काळ पाहणी केली आहे. त्यानुसार ही खांड भरण्याचे काम ठेकेदारांनी युद्धपातळीवर सुरु केली आहे. मात्र, घटनास्थळी असे कोणतेही काम सुरु नाही.