एकशे तीन गावांवर दरडीचे सावट

दरडग्रस्त गावांचे भूवैज्ञानिकांकडून सर्वेक्षण

। रायगड । प्रतिनिधी ।

भूवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यातील 103 गावांना दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या संभाव्य दरडग्रस्त गावांना पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरडग्रस्त गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या वैज्ञानिकांनी दिले आहेत. गावनिहाय कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. संभाव्य दरडग्रस्त गावांसाठी शासनाने कृती आराखडा तयार केला आहे. गावनिहाय आपत्ती व्यवस्थापनासाठी एका अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आली आहे. स्थलांतरित कराव्या लागणार्‍या कुटुंबांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे नियोजन केले जात आहे.

जिल्ह्यात 2005 मध्ये झालेल्या भुस्खलनाच्या घटनांमध्ये 212 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. 2021 मध्ये तळीये गावावर दरड कोसळली होती. ज्यात 84 जणांचा मृत्यू झाला होता. तर गेल्या वर्षी इरशाळवाडी येथे दरड कोसळून 84 जण दगावले होते. सातत्याने होणार्‍या या घटनेची दखल घेऊन जिल्ह्यातील संभाव्य दरडग्रस्त गावाचे जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या भूवैज्ञानिकांमार्फत सर्वेक्षण करण्ययात आले होते. यात प्रामुख्याने डोंगर उतारावरील गावांचा समावेश होता. नैसर्गिक धोके सौम्यीकरण पथदर्शी प्रकल्पा आंतर्गत ही पहाणी करण्यात आली होती. या आंतर्गत सुरुवातीला जिल्ह्यातील 84 गावांचा दरडग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र आता ही संभाव्य दरडग्रस्त गावांची संख्या 103 वर पोहोचली आहे. रायगडमधील 9 गावे (वर्ग 1) अतिधोकादायक, 11 गावे (वर्ग 2) धोकादायक व 83 गावे वर्ग 3) सौम्य धोकादायक आहेत.

डोंगर उताररावरील वृक्ष तोड, बेकायदा खोदकाम, पाण्याचा निचरा होणार्‍या मार्गात अडथळे, पावसाळी हंगामात जमिनीस भेगा पडणे, अस्थिर भूभागावरील बांधकाम ही दरड कोसळण्याची प्रमुख कारण आहेत असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. पुणे येथील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) विभागाच्या शास्त्रज्ञांनी या गावांना भेट देऊन पहाणी केली. या पहाणीत शास्त्रज्ञांच्या अनेक धक्कादायक बाबी नजरेसमोर आल्या आहेत. त्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. दरम्यान 103 दरडग्रस्त गावांमध्ये अनेक उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी भूवैज्ञानिकांनी काही सूचना केल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

तालुकानिहाय संभाव्य दरडग्रस्त गावे
महाड- 49
पोलादपुर- 15
रोहा- 13
म्हसळा- 6
माणगाव- 5
पनवेल- 3
खालापूर- 3
कर्जत- 3
सुधागड- 3
श्रीवर्धन- 2
तळा- 1
भूवैज्ञानिक यांनी सुचवलेल्या उपाययोजना
जिल्ह्यातील संभाव्य दरडग्रस्त गावांमधील धोका कमी करण्यासाठी भूवैज्ञानिकांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. यात प्रामुख्याने या परीसरातील खाणकाम आणि उत्खननावर निर्बंध घालण्यात यावे, डोंगर उतारावर वृक्ष तोडण्यास मज्जाव करण्यात यावा, पावसाळ्यापुर्वी डोंगर उतारवर सैल झालेले दगड हटवण्यात यावेत. डोंगर उतारावरील पाण्याचा निचरा वेगाने व्हावा यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, आणि दरड रोधक भिंतीची उभारणी करण्यात यावी.

अतिधोकादायक श्रेणी आणि धोकादायक श्रेणीतील नागरिकांना पावसाळ्यापूर्वी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या गावांमध्ये करावयाच्या उपययोजनांबाबत तातडीने पाऊले उचलण्यास सांगण्यात आले आहे.

किशन जावळे,
जिल्हाधिकारी,
रायगड
Exit mobile version