उमटे धरणफुटीची भीती

ओव्हरफ्लोची भिंत मोजतेच अखेरची घटका


| रायगड | प्रतिनिधी |

कोकणसह रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचे प्रमाण सर्वाधिक आहे. अशातच हजारो गावांना पाणीपुरवठा करणार्‍या काही धरणांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. यापैकी एक असलेले अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाची ओव्हरफ्लोची भिंत कोणत्याही क्षणी फुटून हाहाकार माजण्याची भीती वर्तवली जात आहे. असे घडल्यास उमटे धरण फुटीच्या आपत्तीला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल उमटे धरण संघर्ष समितीचे अ‍ॅड. राकेश पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला केला आहे.


अ‍ॅड. पाटील यांनी शुक्रवारी (दि.14) मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रा.जि. परिषद, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, तसेच रायगड जिल्हाधिकारी यांना उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या वतीने निवेदन दिले आहे. त्यांनी निवेदनात नमूद केले आहे की, अलिबाग तालुक्यातील 47 गावे व 33 वाड्या ह्या उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. सदरच्या उमटे धरणाची निर्मिती ही 1978 साली करण्यात आली असून, सदरचे धरण जीवन प्राधिकरणामधून रायगड जिल्हा परिषदेस 1995 साली हस्तांतरीत झाले आहे. उमटे धरणाच्या बांधकामानंतर धरणाच्या संरक्षण भिंतीची व बांधाची दुरूस्ती कधी आणि केव्हा झाली याची माहिती स्थानिकांना नाही. तसेच धरणाच्या दुरूस्तीवर किती खर्च झाला आहे, याचीही माहिती स्थानिकांना नाही.

उमटे धरणाची व धरणाचे संरक्षण करणार भिंतीची व बांधाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. सन 2017 ते 2019 पासून आपल्या कार्यालयात धरणाच्या संरक्षण भिंतीच्या दुरवस्थेबाबत तक्रार अर्ज करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात धरणाच्या ओव्हरफ्लोची संरक्षण भिंतीच्या खालची माती खचून दगडांची भिंत शेवटची घटका मोजत असून, सदरची संरक्षण भिंत या पावसाळ्यात वाहून जाऊन धरण फुटून मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तातडीने धरणाचे आणि धरणाच्या संरक्षण भिंतीचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करणे आवश्यक आहे. कोकणासह रायगड जिल्ह्यात आपत्तीच्या घटना घडलेल्या आहेत. त्या रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन आपत्ती घडल्यावर उपाययोजना करतात. त्यामुळे अशी आपत्ती घडण्याआधीच 47 गावे व 33 वाड्या अंदाजे 3 लाखांच्या वर लोक प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने उमटे धरणाची व धरणाच्या संरक्षण बांधांचे व भिंतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून ओव्हरफ्लोच्या भिंतीचे तात्काळ बांधकाम करून धरणाचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

उमटे धरण दुरुस्ती आणि गाळउपसा या प्रश्‍नावर आम्ही वर्षनुवर्षे प्रशासनकडे अर्ज विनंत्या करूनही प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. अशातच पावसाळ्यात काही मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी झाल्यास संबंधित अधिकार्‍यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत.

अ‍ॅड. राकेश पाटील,
उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड
Exit mobile version