योग्य खत व्यवस्थापनातून उत्पादन वाढ शक्य
| चौल | प्रतिनिधी |
नारळ बागायतीत संतुलित खत व्यवस्थापन आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन बागायतदारांचे उत्पन्न वाढू शकते, असे प्रतिपादन नारळ विकास मंडळाचे अधिकारी रवींद्रकुमार सिंग यांनी केले.
नारळ विकास मंडळ (ठाणे) आणि कृषक कल्याणकारी संस्था, चौल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 29 ते 30 मार्च रोजी चौल येथील डी. के. मनोहर ॲण्ड सन्स येथे आयोजित खतवाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला परिसरातील नारळ उत्पादक बागायतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. या उपक्रमांतर्गत पीआयसीसीएस योजनेद्वारे 86 बागायतदारांना खतांचे वाटप करण्यात आले. तसेच सिंगल सुपर फॉस्फेट खताबरोबर आंतरपीक म्हणून मिरीच्या रोपांचेही वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील, सचिव प्रकाश पाटील, तसेच वसंत घरत, विनायक थळकर, सुधाकर राऊळ आणि दिलीप पाटील उपस्थित होते. रवींद्रकुमार सिंग यांनी मार्गदर्शन करताना आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादन क्षमता वाढण्यास मोठी मदत होईल, असे सांगत बागायतदारांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
आधुनिक शेतीचा स्वीकार करावा
बागायतदारांना आधुनिक शेती पद्धती स्वीकारण्याचे आवाहन केले. नारळ बागायतीत योग्य नियोजन, खत व्यवस्थापन आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादन वाढीसोबत उत्पन्नातही वाढ होऊ शकते, असे ते म्हणाले. तसेच, शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आपल्या शेतीत सुधारणा करावी आणि संघटितपणे पुढे यावे, असेही त्यांनी नमूद केले.






