भातपिकांना खताची मात्रा देण्याची कामे खोळंबली
| चिरनेर | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील थळ येथे खतनिर्मितीसाठी आरसीएफचा कारखाना आहे. मात्र, कारखाना जिल्ह्यात अन् जिल्ह्यातच खतांचा तुटवडा, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिकांना सध्या खतांची आवश्यकता असताना ऐन हंगामातच शेतकऱ्यांना खतांच्या टंचाईला सामोरो जावे लागत आहे. मागणी केलेले युरिया खत मिळत नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. जिल्ह्यातील उरणसारख्या हजारो हेक्टर शेती असलेल्या भागात शेतकऱ्यांना खतासाठी वाट पाहावी लागत आहे. खत खरेदीसाठी स्थानिक कृषी केंद्राकडे गेले असता अनेकदा खत उपलब्ध नसल्याचे सांगतात. यामुळे वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. कंपनी व्यवस्थापनाने याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची शेतकरी मागणी करीत आहेत.
उरण तालुक्यातील ग्रामीण विभागात रासायनिक तसेच मिश्रण खतांचा तुटवडा निर्माण झाला असून, शेतकरीवर्गाला खतांसाठी धावाधाव करावी लागत आहे. खरीप हंगामात घेण्यात आलेल्या भात रोपांच्या उत्तम वाढीसाठी शेतकरी खतांचा वापर करतात. मात्र, भात रोपांची वाढ जलद व्हावी, यासाठीदेखील या भागात पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांकडून ऐकवास मिळत आहेत. तालुक्यात भात लावण्याची कामे आता शंभर टक्के पूर्णत्वास गेली आहेत. यावर्षी पावसाने वेळेपूर्वीच म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस हजेरी लावली. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. त्यापाठोपाठ लगेच मान्सूनची हजेरी त्यामुळे शेतीच्या कामात मोठ्या अडचणी आल्या. शेतकऱ्यांना धूळ वाफ्याची पेरणी करताच आली नसल्यामुळे, येथील शेतकऱ्यांना चिखल पेरा करावा लागला. जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार तिबार भाताची पेरणी करावी लागली. एकंदरीत, शेतकऱ्यांपुढे निसर्गाचे मोठे आव्हान होते. त्यानंतर भात रोपे तयार झाल्यावर जुलै महिन्याच्या मध्यंतरी भात लावणीला सुरुवात झाली. अशातच शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली. मात्र, भातरोपांची कमतरता असल्यामुळे भात खाचरातील शेतकऱ्यांना शेतीची लागवड करण्यासाठी भातरोपे कमी पडली. मात्र, अशा अवस्थेत शेतकऱ्यांनी कशीबशी भातलावणी पूर्ण केली.
दरम्यान, काही विरळ प्रमाणात शिल्लक राहिलेल्या आणि आपली शेती ओसाड राहू नये यासाठी अनेक ठिकाणाहून शेतकऱ्यांनी भाताची रोपे विकत आणून, त्या रोपांची लागवड आपल्या शेतात केली आहे. या भातपिकांच्या भरघोस वाढीसाठी शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासू लागला आहे. उरण, पनवेलमध्ये कुठेही खते उपलब्ध नसल्याची माहिती मिळत असतानाच रविवारी (दि.3) ऑगस्ट रोजी कोप्रोली येथे 25 टनाची खताची गाडी आली होती. यावेळी प्रत्येक शेतकऱ्याला खताच्या दोनच बॅगा देण्यात आल्या. मात्र, हे 25 टन खत हातोहात संपल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. विशेषतः अनेक शेतकऱ्यांना वेळेवर विक्रेत्यांकडून खते मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिकांना खताची मात्रा देण्याची कामे खोळंबली आहेत. तर, खतांचा तुटवडा होत असलेल्या गोष्टींना जबाबदार कोण? असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. दरम्यान, याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आरसीएफ प्रशासनाशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.
बफर स्टॉक म्हणजे काय?
बफर स्टॉक म्हणजे डिलरकडे असलेला संरक्षित साठा. ज्यावेळी खतांची टंचाई भासते, त्यावेळी डिलरने बफर स्टॉकमधून खताची ऑर्डर करुन शेतकऱ्यांना खते पुरविली पाहिजे. बफर स्टॉकचे शैलवले यांच्याशी डिलरने संपर्क साधून खते उचलावीत आणि शेतकऱ्यांना खरीप हंगामातील खतांची वेळीच पूर्तता करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
आजघडीला युरिया खताचा तुटवडा आहे. पूर्वी शेतकरी खत म्हणून शेण, गोवराचा वापर करीत असत. परंतु, आता या भागात गुरे पाळण्याचे प्रमाण खूपच कमी झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना आता पर्याय म्हणून रासायनिक खतांचा वापर करावा लागत आहे. संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून समजल्या जाणाऱ्या शेतकरीवर्गाला त्यांच्या पिकांसाठी खत विक्रेत्यांकडे पुरेसा खत उपलब्ध होत नसल्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे.
कृष्णा म्हात्रे,
चिरनेर
उरण तालुक्यात सध्या लागवडीखाली येत असलेल्या जमिनीसाठी खताची गरज आहे. परंतु, सध्या उरण, पनवेल तालुक्यात कुठेही खते उपलब्ध नाहीत. कृषी विभागाकडून आरसीएफमध्ये खताची मागणी केली असता, आरसीएफकडून 25 टन खत उरण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाले आहे. परंतु, हा खताचा पुरवठा पुरेसा नाही. आरसीएफकडून खतपुरवठा होईपर्यंत गरजेनुसार विक्रेत्यांनी लागणाऱ्या खतासाठी बफर स्टॉकचा वापर करून, शेतकऱ्यांसाठी खते उपलब्ध करून द्यावीत.
एस.जी. गटकळ,
कृषी विभाग







