पारंपरिक मासेमारी व्यवसाय धोक्यात
। अलिबाग । प्रतिनिधी ।
एलईडी दिव्यांद्वारे मासेमारीला बंदी असतानादेखील जिल्ह्यातील समुद्रात खुलेआमपणे याद्वारे मासेमारी केली जात आहे. त्यामुळे समुद्रातील मासळीचे प्रमाण कमी होऊ लागले असून, जेलीफिशचा वावर वाढल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्याचा फटका पारंपरिक मासेमारी करणार्या मच्छिमारांना बसू लागला आहे. त्यामुळे ते मोठ्या आर्थिक संकटात सापडू लागले आहेत.
जिल्ह्यात यांत्रिकी व बिगर यांत्रिकी अशा एकूण चार हजारांहून अधिक बोटी आहेत. जिल्ह्यातील मच्छिमार मासेमारीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. या व्यवसायातून लाखो लोकांना रोजगार मिळत आहे. मासेमारी करण्यापासून मासळी काढणे, मासळी निवडणे, सुकविणे, बाजारात विकण्यासाठी नेणे, अशा अनेक प्रकारच्या कामांसाठी स्थानिकांना रोजगार प्राप्त होत आहे. मात्र, जिल्ह्यात एलईडी दिव्यांद्वारे मासेमारी राजरोसपणे रात्रीच्यावेळी सुरु आहे. या मासेमारीमुळे समुद्रातील लहान मासळीदेखील नष्ट होऊ लागली आहे. त्याचा परिणाम मासळीच्या उत्पादनावर होऊ लागला आहे. एलईडीद्वारे होणार्या मासेमारीमुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणार्या मच्छिमारांना समुद्रात मासळी मिळेनाशी झाली आहे. मासळी समुद्रात मिळत नसल्याने अनेकांना रिकाम्या हातीच परतण्याची वेळ येत आहे. प्रत्येक फेरीसाठी डिझेल, बर्फ, पगारावरील खर्च पाण्यात जात आहे. त्यामुळे बोटी किनारीच उभ्या करण्याची वेळ मच्छिमारांवर आली आहे.
एलईडीद्वारे होणार्या मासेमारीमुळे मच्छीमारांचा पारंपारीक व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे सरकारने एलईडी मासेमारीवर निर्बंध करावे अशी मागणी विजय गिदी यांनी केली आहे.