| रायगड । प्रतिनिधी ।
वातावरणातील सततच्या बदलामुळे मासे मिळण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आला असून, त्यावर अवलंबून असलेली हजारो कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. मासेमारी हा कोकणातील मुख्य व्यवसाय असून, जिल्ह्यातील 15 हजार पेक्षा जास्त कुटुंब मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. या व्यवसायातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत. असली तरी मागील काही दिवसांपासून ही उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे मच्छीमार कुटुंबीयांची आर्थिक घडी विस्कटली आहे. ऑगस्ट महिन्यापासून पारंपरिक मासेमारीपाठोपाठ पर्ससीननेट मासेमारीही सुरू होते. मात्र, गेले काही महिने मासे मिळण्याचे प्रमाण चांगलेच घटले आहे. गेल्या काही दिवसांत वातावरणात अनेकदा झालेल्या बदलांमुळे बहुतांश मासेमारी नौका किनार्यावरच नांगरून ठेवण्यात आल्या. ज्यावेळी वातावरण चांगले होते, त्यावेळी खोल समुद्रात जाऊनही मासे अत्यल्प प्रमाणात मिळाले. वातावरणातील बदलामुळेच मत्स्य साठ्यांवर परिणाम झाला असण्याचीही शक्यता आहे.
मासळीच्या निर्यातीवर परिणाम मासे कमी प्रमाणात मिळत असल्याने ज्या नौका समुद्रात जातात, त्यांच्या खलाशांचा खर्चही भागत नाही. मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम मासळीच्या निर्यातीवरही झालेला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणारा मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. डिझेलचा खर्च, बर्फ, खलाशांचा पगार व भत्ता, जाळी व इंजिन दुरुस्ती यावर दररोज होणारा हजारो रुपये खर्च आणि मासळी विकून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न याचा ताळमेळच लागत नसल्याने मच्छीमारांवर रडण्याची वेळ आली आहे. बँकेचे कर्ज तसेच व्यापार्यांकडून आगाऊ रकमेची परतफेड होत नसल्याने मच्छीमारांची आर्थिक घडी विस्कटली आहे.