तक्रार करुनही होडी मालकांवर कारवाई नाही
न्याय न मिळाल्याने उपोषणाचा इशारा
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील राजपुरी बंदरात जून महिन्यात मासेमारी बंदी कालावधी असतानासुद्धा काही बोटींनी शासनाचा आदेश न जुमानता मासेमारी केली होती. याबाबत मत्स्य विभागाकडे जून महिन्यात तक्रार करुनही सप्टेंबर उजाडला तरी कारवाई करण्यात आलेली नाही. त्याविरोधात हरिदास बाणकोटकर यांनी 19 सप्टेंबर रोजी मुरुड तहसील कार्यालयासमारे उपोषणाचा इशारा दिला आहे.
दरम्यान, मत्स्य विकास व परवाना अधिकारी तुषार वाळुंज यांना भ्रमणध्वनीवरून सांगून प्रत्यक्ष ठिकाणी भेट देण्याची विनंती केली होती. परंतु, आपण श्रीवर्धन येथे आहोत असे सांगून संबंधित बोट मालकांवर कार्यवाही करण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे. जून महिन्याची तक्रार असतानासुद्धा सप्टेंबर महिन्यातही कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे अखेर कंटाळून मत्स्य विभगाच्या या गलथान कारभाराबाबत न्याय मिळवण्यासाठी 19 सप्टेंबरपासून मुरुड तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा हरिदास बाणकोटकर यांनी कुटुंबासमवेत दिला आहे. सदरचे निवेदन जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा पोलीस अधीक्षक, सहाय्य्क आयुक्त मत्स्य व्यवसाय अधिकारी अलिबाग, मुरुड तहसीलदार व मुरुड पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे.
मासळी विक्रेत्या महिलांना शासनाकडून विशेष आर्थिक सहाय्य अनुदान म्हणून सहा हजार रुपये दिले गेले आहेत. राजपुरी येथील महालक्ष्मी मच्छिमार सोसायटीचे कायमस्वरूपी सभासद आहोत.एवढे असूनदेखील या सोसायटीने सभासद दाखला न दिल्यामुळे आम्हाला हे आर्थिक सहाय्य मिळू शकलेले नाही. हे पैसेसुद्धा सोसायटीने दिलेले नाहीत. मुरुडच्या मत्स्यविकास व परवाना अधिकारी यांना निवेदन देऊनसुद्धा मला पैसे मिळवून देण्यासाठी ते कोणतेही प्रयत्न करीत नाहीत. माझ्यावर अन्याय होत असेल तर अधिकारीवर्गांनी मला न्याय मिळवून देणे आवश्यक होते. परंतु, माझ्याकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याचा आरोप श्री. बाणकोटकर यांनी केला आहे.