कासाडीची नासाडी

रासायनिक सांडपाण्यामुळे नदीच्या पाण्यावर तरंगतोय फेस

। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।

कासाडी नदीची प्रदूषणापासून सुटका करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असताना नदीत पसरलेल्या फेसयुक्त पाण्यामुळे प्रशासनाचा दावा किती तकलादू आहे, हे स्पष्ट होत आहे. नदीवर पसरलेल्या फेसावरुन नदीची प्रदूषणापासून मुक्तता करण्यासाठी प्रशासन करत असलेले प्रयत्न निष्फळ ठरले असल्याचे चित्र समोर आले आहे.

कासाडी नदी आणि नदीत होणार्‍या प्रदूषणाची दखल जागतिक माध्यमांनीदेखील घेतली आहे. शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी हा मुद्दा हरित लवादात दाखल केला असून लवदाने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ तसेच महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून औद्योगिक वसाहतीत होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलण्यात येत असल्याची माहिती वेळोवेळी दिली जाते. प्रत्यक्षात मात्र कासाडी नदीतील पाणी अद्यापही प्रदूषित असल्याचे पाहायला मिळते. तालुक्याच्या पश्‍चिमेकडील नवरा-नवरीच्या डोंगरातून वाहणार्‍या कासाडी नदीच्या पाण्यावर एकेकाळी मोठ्या प्रमाणात भाजीचे मळे फुलत होते. परंतु तळोजा परिसरात औद्योगिकरण सुरू झाले. त्यानंतर काही कारखान्यांनी प्रदूषित सांडपाणी थेट नदीत सोडण्यास सुरुवात केली. या प्रदूषणामुळे नदीतील जैवविविधता धोक्यात आली. माशांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्याने याचा परिणाम होऊन नदीतील मासेमारी पूर्णपणे बंद झाली. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली .मात्र अशा स्थितीत काही सामाजिक संघटना आणि राजकीय व्यक्तींनी या बिकट परिस्थितीत कासाडी नदीला पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्यासाठी आणि नदीचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी लढा दिला. या लढ्याला काही प्रमाणात यश आले असले तरी कासाडी नदीत केले जाणारे प्रदूषण पूर्णपणे रोखण्यात मात्र प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी कारखान्यामधील रसायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात आहे.

मच्छिमारांवर संकट
तळोजा एमआयडीसीतील सूमारे 340 हेक्टर जमिनीवर एमआयडीसीमार्फत उभारण्यात आलेल्या औद्योगिक वसाहतीतून मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होत असल्याने पर्यावरणाला बाधा पोहचत असल्याची तक्रार नागरिकांनी वारंवार संबंधित प्राधिकरणांकडे केली आहे. तळोजा एमआयडीसीत सूमारे 930 उद्योग असून त्यापैकी 360 उद्योग हे रसायने, खते व मत्सउद्योगाशी संबंधित असून या कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी व वायू बाहेर सोडले जातात. या कारखान्यातील सांडपाणी हे लगतच्या कासाडी नदीत सोडण्यात येत असल्याने मासेही मृत्य पावत असून मच्छीमारांवर संकट ओढावले आहे.
सीईटीपी प्रकल्प कार्यान्वित
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधून बाहेर पडणारे पाणी प्रक्रिया करून खोल समुद्रात सोडण्यासाठी वसाहतीत प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात औद्योगिक वसाहतीमधील 230 कारखान्याच्या सांडपाण्याच्या वाहिन्या जोडण्यात आल्या आहेत. या वाहिन्यांद्वारे प्रक्रिया केंद्रात दररोज सोडण्यात येणार्‍या जवळपास 20 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते.

कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी प्रक्रिया केंद्रापर्यत नेण्यासाठी वापरण्यात येणार्‍या वाहिन्या अनेकदा कचर्‍यामुळे बंद होतात. यामुळे पाणी प्रक्रिया केंद्रापर्यत पोहचत नाही. यामुळे अनेकदा सांडपाणी नदीपात्रात जात असल्याने अशा बंद झालेल्या वाहिन्या लवकरात लवकर स्वच्छ करण्याच्या सूचना एमआईडीसीला देण्यात आल्या आहेत.

– वैभव भालेरात, अधिकारी,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

Exit mobile version