| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील डोंगरमाथ्यावर वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वनसंपदेला याचा मोठा फटका बसत आहे. वन विभागाकडून जंगल वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, ते तुटपुंजे असल्याचे वन्यप्रेमींकडून बोलले जात आहे.
वणव्यांमुळे तालुक्यातील जंगलांचे प्रचंड नुकसान होत आहे. या वणव्यांमुळे जंगलातील वृक्ष, तसेच पशू, पक्षी आगीत होरपळून नष्ट होत आहेत. नैसर्गिक किंवा मानवी हस्तक्षेपामुळे वणवे लागत असून, यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मोठे झाड पडले की होणारे घर्षण, आकाशातून कोसळणारी वीज, अतिउष्णतेमुळे कोरडे गवत व पाने पेटणे, गवत कुजून मिथेनसारखा ज्वलनशील वायू तयार होत असल्याने वणवे लागत असल्याचे बोलले जात आहे. तर काही वेळा मानवी हस्तक्षेपामुळेदेखील वणवे लागत असल्याने त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी वन्यप्रेमींकडून करण्यात येत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी तालुक्यातील काशे डोंगराकडील पिरकोन गावाच्या बाजूच्या भागात मोठ्या प्रमाणात वणवा लागला होता. या घटनास्थळी वन्यप्रेमी पोहोचेपर्यंत अनेक भाग जळून खाक झाल्याचे दोस्ती सदाबहार ग्रुपचे सदस्य संतोष जोशी यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून वणव्याबाबत जनजागृतीची मोहीम वन विभागाने हाती घेतली आहे. वन विभागाच्या माध्यमातून कुठेही वणवा पेटला, तर त्वरित घटनास्थळी पोहोचून तो विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केले जाते, असे वन अधिकारी व्ही.जी. कोकरे यांनी सांगितले.