सेंद्रिय शेती गटाने बांधले वनराई बंधारे

| चिरनेर | वार्ताहर |

गाव पातळीवर पाणी आडवा पाणी जिरवा, ही संकल्पना राबवणे काळाची गरज असून, शेतकरी आणि पशुपक्ष्यांसाठी वनराई बंधारे वरदान ठरत आहेत. चिरनेर येथील श्री महागणपती सेंद्रिय गटातर्फे दोन वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्याचा वापर करता येणार आहे.

तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ-नारनवर, मंडळ कृषी अधिकारी किसन शिगवण, श्री महागणपती सेंद्रिय शेती गटाचे अध्यक्ष तथा कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील, कृषी पर्यवेक्षक शिवाजी लोहकरे, कृषी सहाय्यक अधिकारी सुरज घरत यांच्या मार्गदर्शनाखाली बंधारे उभारण्यात आले.

दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र ते पाणी छोट्या-मोठ्या नद्या, ओढ्यांमध्ये जाते. त्यानंतर नद्या नाले कोरडे पडतात. वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडविले, तर काही महिने या पाण्याचा वापर करणे शक्य आहे, तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.

प्रत्येकाने आपले नैतिक कर्तव्य म्हणून पाणी अडविले पाहिजे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही. पशुपक्षी, झाडे, शेती मानवासाठी पाण्याची आवश्यकता असते.

अर्चना सुळ-नारनवर
उरण तालुका कृषी अधिकारी

पाण्याचे महत्त्व जाणून घेऊन बंधारा बांधून पाणी अडविले पाहिजे. या पाण्याचा वापर गुरे, वन्यप्राणी यांना पिण्यासाठी होत असतो. शिवाय शेतकरीवर्गाला भाजीपाल्याचे उत्पन्न घेता येते. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होते. त्यासाठी ग्रामपंचायत तसेच कृषी विभागाने या संदर्भात लक्ष घालून ही संकल्पना राबविणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

प्रफुल्ल खारपाटील
अध्यक्ष, श्री महागणपती सेंद्रिय शेती गट, चिरनेर
Exit mobile version