। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टी-20 विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या संघातील खेळाडूंची सुट्टी आता संपण्याच्या मार्गावर आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर वरिष्ठ खेळाडू विश्रांतीवर गेले होते. रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जडेजा आपापल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. अशात भारतीय संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कामाला लागला आहे. त्याच्यासमोर अजिंक्यपद चषक 2025, टी-20 विश्वचषक 2026, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अशी आवाहने आहेत.
गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताचा पहिला दौरा श्रीलंकेत होणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी गौतमला सर्व वरिष्ठ खेळाडू हवे आहेत. भारताचा मुख्य संघ गौतमच्या मार्गदर्शनखाली श्रीलंकेत 3 टी-20 व 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहेत. रोहितन टी-20 तून निवृत्ती घेतल्यानंतर भारताच्या टी-20 संघाच्या कर्णधारपदासाठी हार्दिक पांड्याचे हे नाव आघाडीवर आहे. पण, आगामी एकदिवसीय स्पर्धा लक्षात घेता गौतमला वरिष्ठ खेळाडू हवे आहेत. त्यामुळेच त्याने रोहित, विराट, जसप्रीत व जडेजा यांना एकदिवसीय मालिकेसाठी सुट्टी संपवून परत या, असे सांगितले आहे. हे वरिष्ठ खेळाडू गौतमला एकदिवसीय संघात हवेच आहेत, असे गौतम गंभीरकडून सांगण्यात आले आहे.