दोन अग्निशमन गाड्यांच्या मदतीने नियंत्रण
| पनवेल | प्रतिनिधी |
मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळील मोकळ्या मैदानात टाकलेल्या पालिकेच्या कचऱ्याला अचानक भीषण आग लागली, आणि काही क्षणांतच काळ्या धुराचे प्रचंड लोट संपूर्ण परिसरात पसरले. अचानक उठलेल्या या धुरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. ही जागा अनेक दिवसांपासून पनवेल महानगरपालिकेच्या वृक्ष विभाग आणि घंटागाडी कर्मचाऱ्यांनी टाकलेल्या कचऱ्याने भरलेली होती.
परिसरातील नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रारी ही केल्या होत्या. मात्र, तो कचरा हटवला गेला नव्हता. आज सकाळी अचानक लागलेल्या आगीमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली. काही मिनिटांतच पनवेल महानगरपालिकेच्या दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले, पण कचरा, सुक्या फांद्या आणि झुडुपांमुळे ज्वाळांनी काही क्षणांतच उग्र रूप धारण केले होते. जवळपास तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. या आगीत झाडांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने आसपास कोणतीही घरे नसल्याने आणि लोकांची वर्दळ कमी असल्याने जीवितहानी टळली. मोकळ्या मैदानात नियमितपणे कचरा, वृक्ष छाटणीचा माल आणि सुक्या फांद्या टाकल्या जातात. असे कचऱ्याचे ढिग साचल्यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत. जबाबदार कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे.
घटनेनंतर अग्निशमन दलाने परिसरातील कचरा, झुडुपे व ज्वलनशील साहित्य तातडीने हटवण्याची सूचना दिली. तसेच भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी या जागेवर पहारा ठेवण्याचा सल्ला ही दिला आहे. कामोठ्यात वारंवार घडणाऱ्या अशा घटना लक्षात घेता, पालिकेच्या कचरा व्यवस्थापनावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षछाटणी आणि कचरा संकलनामुळे ही समस्या वाढत चालली आहे. नागरिकांनी यावर योग्य ती कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
नागरिकांची नाराजी व्यक्त
पालिकेचे कर्मचारी मोकळ्या जागेत कचरा टाकतात, त्यामुळे परिसरात घाण पसरतेच, पण आगीसारख्या धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागते. आजची आग हे त्याचेच उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.







