| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळजवळील कोलिवली येथे असलेल्या सटुआईच्या यात्रेच्या निमित्ताने मागील पंधरा दिवस यात्रा सुरु होती. पौष महिना सुरु झाला आणि यात्रा भरली आणि पौष महिन्याची पौर्णिमा आल्यावर यात्रा संपली आहे. मात्र, त्या 15 दिवसांत कोलिवली गावाच्या आजूबाजूला पाच किलोमीटर परिघात मोठ्या प्रमाणात कचरा साठून राहिला आहे. दरम्यान, भाविकांनी आपल्यासोबत आणलेले प्लास्टिक पत्रावळी, पाण्याच्या बाटल्या तसेच खाऊचे पदार्थ यांचे ढीग आढळून येत आहेत.
कर्जत तालुक्यातील नेरळजवळ असलेल्या कोलिवली गावात सटुआईचे मंदिर आहे. त्या मंदिरात दरवर्षी पौष महिन्याच्या पहिल्या दिवशी यात्रा भरते. आपल्या बाळाच्या जन्माचे भविष्य सटुआई लिहिते तसेच आपल्या बाळाचे भविष्य उज्ज्वल व्हावे, आपल्याला अपत्य व्हावे म्हणून विवाहित दाम्पत्य नवस करीत असतात. दरम्यान, ते नवस फेडण्यासाठी भक्त या यात्रेत मोठ्या संख्यने येत असतात. रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील भाविकांची पौष पौर्णिमेपर्यंत चालणार्या या यात्रेत गर्दी असते. 26 डिसेंबर रोजी सटुआईची मुख्य यात्रा पार पडली आणि त्यानंतर ही यात्रा 6 जानेवारी पर्यंत पौष पौर्णिमा पर्यंत सुरु होती. या कालावधीत रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील देवीचे हजारो भक्तांनी आपल्यासोबत आणलेले अन्न शिजवून जेवण बनवून खाल्ले.
त्यासाठी भक्तांनी कोलिवली गावाच्या पाच किलोमीटर च्या परिसरात राहुट्या उभारल्या होत्या. मात्र त्या सर्वांनी त्या 15 दिवसात केलेल्या कचर्याचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. भक्तांनी आपल्या सोबत आणलेली पत्रावळ्या,कागदाच्या पिशव्या,प्लास्टिक पिशव्या आणि पाण्याच्या बॉटल, रेटर बाटल्या यांचा ढीग परिसरात दिसून येत आहे. दरम्यान, या कचर्यामध्ये दारूच्या बाटल्यांचा देखील वेगळा ढीग त्या भागात दिसून आला आहे. त्यामुळे भक्त देवीच्या दर्शनासाठी की अन्य कारणासाठी कोलिवली येथे येतात, हा प्रश्न कायम राहात आहे.