‘आखाती तणावाचा’ परिणाम; पर्यटन अर्थव्यवस्थेला मोठा धक्का
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे संपूर्ण पर्यटन पट्टा संकटात सापडला असून, हॉटेल उद्योग अक्षरशः कोलमडण्याच्या उंबरठ्यावर आला आहे. दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर या लोकप्रिय पर्यटनस्थळांमध्ये अनेक हॉटेल्सनी तात्पुरते शटर खाली ओढले असून, उर्वरित व्यवसायही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या अभूतपूर्व परिस्थितीमुळे स्थानिक अर्थचक्र आणि रोजगारावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. विशेष म्हणजे घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत असताना व्यावसायिक सिलिंडर मात्र उपलब्ध होत नसल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. उपलब्ध झाल्यासही सिलिंडरचे दर प्रचंड वाढवले जात असल्याने लहान व मध्यम व्यावसायिकांना व्यवसाय चालवणे अशक्य होत आहे.
सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा अप्रत्यक्ष परिणाम एलपीजी पुरवठ्यावर होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत मोठ्या प्रमाणावर एलपीजी आयातीवर अवलंबून असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार, वाहतूक अडचणी आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय यांचा स्थानिक स्तरावर परिणाम जाणवू लागला आहे. यामुळे व्यावसायिक गॅस पुरवठा अधिकच अनियमित झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
या संकटामुळे अनेक हॉटेल्सना पर्याय म्हणून लाकूड किंवा पारंपरिक चुलींचा वापर करावा लागत आहे. मात्र, त्यामुळे खर्च वाढत असून, सेवा देण्यात विलंब आणि अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी, पर्यटकांच्या अनुभवावरही परिणाम होत आहे, त्यामुळे हॉटेल उद्योगावर ‘अस्तित्वाचा’ प्रश्न निर्माण झाला आहे काही ठिकाणी मेन्यू मर्यादित करण्यात आले असून, काही हॉटेल्सनी पूर्णपणे सेवा बंद केली आहे.
श्रीवर्धन हा कोकणातील एक महत्त्वाचा पर्यटन केंद्र असून, सुंदर समुद्रकिनारे आणि धार्मिक स्थळांमुळे येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. मात्र, सध्याच्या गॅस टंचाईमुळे हॉटेल्स, खानावळी, बीच स्टॉल्स आणि होमस्टे व्यवसायावर थेट परिणाम होत आहे. पर्यटकांना जेवण व निवासाची गैरसोय होत असल्याने अनेकांनी पर्याय म्हणून इतर पर्यटनस्थळांकडे वळण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे येथील पर्यटनावर काळे ढग तयार झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पर्यटनावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. रोजंदारी कामगार, वेटर्स, कुक, वाहनचालक आणि छोट्या व्यावसायिकांवर बेरोजगारीचे संकट कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. गॅसटंचाईमुळे निर्माण झालेली ही साखळी प्रतिक्रिया संपूर्ण स्थानिक अर्थव्यवस्थेला हादरा देणारी ठरत आहे, त्यामुळे स्थानिक अर्थचक्र धोक्यात आहे.
हॉटेल व्यावसायिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “घरोघरी गॅस मिळतोय, पण व्यावसायिक वापरासाठी सिलिंडर मिळत नाहीत. अशा परिस्थितीत हॉटेलची चूल विझण्याची वेळ आली आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. व्यावसायिक गॅससाठी स्वतंत्र कोटा, नियमित पुरवठा आणि दर नियंत्रणाची मागणी जोर धरत आहे.
पर्यटन हंगाम सुरू असतानाच स्थानिक पुरवठा बिघाड आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव या दुहेरी संकटामुळे श्रीवर्धनमधील पर्यटन व्यवसायावर मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. भविष्यातील बुकिंग्स, पर्यटकांचा विश्वास आणि या पर्यटन पट्ट्याची प्रतिमा धोक्यात आली आहे. श्रीवर्धनमधील गॅस टंचाई ही केवळ स्थानिक पुरवठ्याची समस्या नसून, ती जागतिक घडामोडींशी जोडलेली व्यापक समस्या बनत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर हे संकट दीर्घकालीन बनून श्रीवर्धनच्या पर्यटन ओळखीवरच परिणाम करू शकते.







