। मेलबर्न । वृत्तसंस्था ।
मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर भारतीय ड्रेसिंग रुममधील बेबनावही समोर आला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आणि उर्वरित सिडनी कसोटी भारतीय संघाने जिंकली नाही तर बॉर्डर गावसकर चषक संघ गमावेलच, शिवाय आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या शर्यतीतूनही बाहेर पडेल. त्यामुळे भारतीय संघावर सध्या विजयाचे दडपण आहे. त्यातच मैदानावर आघाडीच्या फलंदाजांची कामगिरी चांगली होत नाही. आणि गोलंदाजीत जसप्रीत बुमराहला इतरांची साथ मिळत नाही. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर खेळाडूंवर वैतागले आहेत. चौथ्या कसोटीत संघ प्रशासनाने आखून दिलेल्या रणनीतीचं पालन न केलेल्या खेळाडूंवर गंभीर नाराज असल्याचे दिसत आहे. पराभवानंतर त्याने ड्रेसिंग रुममध्येच खेळाडूंची एक बैठक बोलावली. आणि यात कुणाचंही नाव घेतले नसले तरी ‘सांगितलेल्या गोष्टींचं पालन न करता मनमनी करणार्या खेळाडूंना आता खपवून घेणार नाही’, असा सज्जड इशाराच गंभीरने दिल्याचे समोर येत आहे.