गावरान भाज्यांना अवकाळीचा फटका

सकस रुचकर व आरोग्यवर्धक भाज्या बाजारातून गायब; आवक घटली, हवामानबदला परिणाम


| पाली/बेणसे | प्रतिनिधी |


पावसाळा संपल्यावर जिल्ह्यात अनेक शेतकरी तसेच आदिवासी वाड्या पाड्यांवरील आदिवासी आपल्या शेतात, परसात, डोंगर उतार व रानमाळावर विविध स्थानिक गावरान भाज्यांची लागवड करतात. मात्र, यंदा अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल अशा कारणांमुळे या गावठी भाज्यांचे नुकसान झाले असून, उत्पादन घटले आहे. त्यामुळे गावठी किंवा गावरान भाज्या कमी प्रमाणात बाजारात येत आहेत. भाजीपाला क्षेत्रदेखील घटले आहे.

या हंगामातील या सकस, रुचकर आणि आरोग्यवर्धक स्थानिक भाज्यांना चांगली मागणी असते. या भाज्यांना विकून स्थानिक शेतकरी व आदिवासी महिलांच्या हाती चार पैसेदेखील मिळतात. आदिवासींबरोबर काही शेतकरीदेखील या भाज्यांची लागवड करतात. दिवाळीपर्यंत बाजारात शिराळे, घोसाळे, कार्ली, माठ, पडवळ, वांगी, भेंडी, काकडी, दुधी, आळुची पाने, गवार, वड्यांची पाने, ठाकरी मिरच्या अशा गावठी भाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत होत्या. मात्र, मागील दोन आठवड्यांपासून तुलनेत या भाज्यांचे प्रमाण व आवक कमी झाली आहे. त्यामुळे या भाज्यांच्या किंमतीदेखील वधारल्या आहेत. सतत बदलणारे हवामान व अवकाळी पाऊस हे येथील शेतकरी व आदिवासींसाठी धोक्याची घंटा आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास शेतकरी व आदिवासींचा हक्काचा रोजगार निघून जाण्याची भीती आहे, असे सुधागड तालुक्यातील शेतकरी शरद गोळे यांनी सांगितले.

मागणी जास्त
कोणत्याही रासायनिक खते किंवा किटकनाशकांचा वापर न करता किंवा अगदी कमी प्रमाणात करून सेंद्रिय खतावर तयार झालेल्या या गावरान भाज्यांना खूप मागणी असते. या भाज्यांचा हा हंगाम दिवाळीनंतरदेखील सुरु असतो. मात्र, यंदा अवकाळी पाऊस आणि त्यानंतर वातावरणात झालेला बदल यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या भाज्यांचे नुकसान झाले. तसेच भाजीपाला उत्पादनात घट होत आहे. या भाज्या मुबलक उपलब्ध असतात तेव्हा अनेक लोक पुण्या-मुंबई येथील मंडईवरून येणाऱ्या भाज्यांवर अवलंबून राहात नाहीत. मात्र, यंदा त्यांचा हिरमोड झाला आहे.

नाईलाजाने मंडईतील भाज्यांची विक्री
गावठी किंवा गावरान भाज्यांचे नुकसान झाल्याने प्रामुख्याने आदिवासी महिलांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी नाईलाजाने त्या पुणे मुंबईतील मंडईतून आलेल्या भाज्या स्थानिक विक्रेत्यांकडून घेऊन विकत आहेत. मात्र, यामध्ये त्यांना कमी फायदा मिळतो. शिवाय, ग्राहकांना गावठी भाज्या न मिळाल्याने त्यांचादेखील हिरमोड होतो.

कंदमुळेसुद्धा कमी
दिवाळीपर्यंत कंदमुळेदेखील मुबलक प्रमाणात मिळत होती. मात्र, मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसामुळे कंदमुळे भिजून खराब झाली आहेत. काहींना मोड आले आहेत. त्यामुळे बाजारात कंदमुळे सुद्धा फारशी विक्रीसाठी येत नाही आहेत.

स्थानिक गावठी भाज्या आवर्जून खातो. त्या खाण्यास खूप चविष्ट, रुचकर व तुलनेने स्वस्त असतात. मात्र, सध्या या भाज्या बाजारात मिळत नाही आहेत.

लता माळी, गृहिणी, पाली

अवकाळी पावसामुळे अनेकांच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. शिवाय, उत्पादनातदेखील घट होत आहे. वातावरणातील बदलामुळे चांगला दर्जेदार भाजीपाला तयार होत नाही. म्हणून भाव मिळत नाही. या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांचे व आदिवासी बंधू भगिनींचे मोठे नुकसान होते.

अभिजित देशमुख, प्रयोगशील शेतकरी, महागाव
Exit mobile version