दरडग्रस्त साखरच्या मुलीचे थाटात शुभमंगल

खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन
। महाड । रविंद्र मालुसरे ।
पोलिस वा खाकी वर्दी म्हंटल की धाक, रुबाब, अशी एक संकल्पना सामान्य नागरिकांच्या डोळ्या समोर उभी राहते. पोलिस अधिकार्‍याला कर्त्यव्यासाठी वेळप्रसंगी थोडे कठोर व्हावे लागत असले तरी वर्दीतही अगोदर तो मनुष्य असतो. त्यालाही मन, भावना असतात. माणुसकीच्या नात्याने प्रसंगी मदत करतात, सल्ला देतात, खाकी वर्दीतील देवमाणूस हे वाक्य साजेल व पोलीस दलाची मान उंचावेल असे काम सध्या ठाणे येथे राहणारे परंतु मूळचे महाड तालुक्यातील किंजळोली – भालेकर कोंड या गावातील निवृत्त पोलीस अधिकारी दिलीप महादेव जाधव यांनी केले आहे.

माणुसकीचे दर्शन घडविणारी ही घटना पोलादपूर तालुक्यातील साखर गावातील रिंगेवाडी येथे घडली आहे. 22 जुलै 2021 च्या अतिवृष्टीमध्ये साखर गावातील सुतारवाडीवर दरड कोसळली, त्यात संपूर्ण वाडी उध्वस्त होताना 6 मृत्यू तर अनेकजण जखमी झाले होते. यातील एका निकटच्या घरात सुनिता विठ्ठल चव्हाण यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी मुंबईमध्ये घरकाम करून व पै पै पुंजी जमवून काही दागिने बनवले होते, दागिन्यांचा तो डबा पुरात वाहून गेला. मुलीचे लग्न तर पुढच्या वर्षी करण्याचे ठरले होते. त्यात पूजाचे वडील विठ्ठल चव्हाण हे अपंग आणि निराधार. त्यामुळे या कुटुंबासमोर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले होते.

पोलादपूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष पवार यांनी महाड येथील तळिये आणि पोलादपूर तालुक्यातील साखर-सुतारवाडी व केवनाळे गावातील पूरपरिस्थीचा आढावा घेण्यासाठी मुंबईतील माणगाव, महाड, पोलादपूर तालुक्यातील सर्व सामाजिक, राजकीय कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मिटिंग आयोजित केली होती. सभेला सुरुवात करताना रवींद्र मालुसरे यांनी महाड पोलादपूरमध्ये आलेल्या पूर परिस्थितीमुळे जनजीवन कसे विस्कळीत होऊन जीवित व वित्तहानी झाली आहे याचा संपूर्ण आढावा घेत केवनाळे येथील 11 वर्षीय साक्षी दाभेकर दिड वर्षाच्या मुलाला वाचवताना पाय गमावून बसली आहे तर साखर येथील पूजा चव्हाण हिचे लग्नाचे दागिने वाहून गेल्याचे सभेत आपल्या भाषणात सांगितले. त्याचवेळी दिलीप जाधव यांनी मालुसरे यांना जवळ बोलावून पूजाच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारत असल्याचे आणि या गोष्टीची कोणाकडेही वाच्यता करू नये असे सांगितले. दागदागिने कपड्यालत्यासह सर्व खर्चाची जबाबदारी घेत जाधव यांनी आश्‍वासनाची पूर्तता करीत पूजाचे लग्न नुकतेच विष्णू सीताराम गोगावले यांच्याशी साखर येथे करून दिले. नवदाम्पत्याला आशिर्वाद देण्यासाठी दोन्ही तालुक्यातील मान्यवर मंडळी यावेळी आवर्जून उपस्थित होती.

मी फक्त माझं कर्तव्य केलं…वेगळं काहीच नाही. पोलिसांना जात नसते ना धर्म असतो. लोकांचं रक्षण, त्यांच्या मदतीला धावणे हाच त्यांचा खरा धर्म असतो. त्यामुळे मानवता हा एकच धर्म मी मानतो. लहानपणी अनुभवलेली गरिबी आणि उदरनिर्वाहासाठी आईसोबत केलेले कष्ट याचे स्मरण मला अजूनही आहे. – दिलीप जाधव, निवृत्त पोलीस अधिकारी

Exit mobile version