शेकापने केले माजलगाव तहसीलसमोर भीक मागो आंदोलन
| बीड |प्रतिनिधी |
शासन आपल्या दारी ही फसवी योजना शासन राबवत आहे. त्यामुळे शासनाच्या विरोधात दुष्काळी नुकसानभरपाई ,पिक विमा, कर्जमाफी, शेतमालाला किफायतशीर हमीभाव आदी मागण्यांसाठी माजलगावात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला. माजलगाव तहसील कार्यालयासमोर ऍड नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या नावाने भीक मागून बोंबा मारो आंदोलन केले व जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या शासनाच्या शासन आपल्या दारी या योजनेचा निषेध केला.
आंदोलनाचे निवेदन नायब तहसीलदार आरसूळ यांच्याकडे दिले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे मुंजा पांचाळ, अनंत चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, विष्णू शेळके, अशोक आढाव, भारत थेटे, हनुमान पांचाळ, सोमेश्वर माने, रुपेश काळे, विजय काळे, दिनकर सोळंके, उद्धव पांचाळ, दत्ता पांचाळ, हनुमान सोळंके, महादेव बादाडे, सूदर्शन आढाव आदी कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.
बीड जिल्हा दुष्काळाच्या झळा सहन करत असताना शासनाने दुष्काळाबाबत कुठलीही उपाययोजना केलेली नाही. दुष्काळी नुकसानभरपाई शेतकऱ्यांना शासनाने दिलेली नाही. पीक विमा दिवाळीपूर्वी देण्याची घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती परंतु अद्याप सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत असून शेतकऱ्यांच्या कापूस , सोयाबीनला भाव नाही व शासन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व पीक विमा द्यायला तयार नाही. परंतु जाहिरातीवर जनतेचा खर्च करत आहे. असं आरोप ऍड. नारायण पाटील यांनी केला.