। खांब । वार्ताहर ।
शेतीच्या मशागतीसाठी ऊन्हाळी हंगामात शेतीच्या बांधावर लावलेले वणवे काळजी न घेतल्याने झाडांच्या मुळावरच उठत आहेत. तर, यामुळे छोटी झाडे झुडपेही आगीच्या भक्ष्यस्थळी पडत असल्याने एकूण बांधावरील वनसंपदा धोक्यात येऊ लागली आहे.
शेतीच्या मशागतीसाठी जमिन भाजलवण्याची परंपरा गेली अनेक वर्षापासून चालू आहे. त्यामुळेच पावसाळी शेतीच्या हंगामापूर्वी दरवर्षी ऊन्हाळ्यात शेतीमध्ये राब भाजले जाते. या पद्धतीमुळे जमिनीचा पोत सुधारतो व उत्पन्नाचे प्रमाणही वाढते. ऊन्हाळी हंगामात साधारणतः होळी सणाच्या काही दिवस अगोदरच राब भाजण्याच्या कामास प्रारंभ केला जातो ते थेट मे महिन्यापर्यंत राब भाजण्याचे काम चालू असते. या कामातंर्गत शेतीमध्ये पालापाचोळा, शेण, विविध जातीचे गवत, वाया गेलेली गुरांची पेंढी, काट्याकुट्या यांची भाजनावळाला वापर केला जातो.
या भाजनावळीत पावसाळ्यात शेतीच्या बांधावरील वाढलेले गवतही जाळले जाते. परंतू गवत जाळल्यानंतरही गवताच्या विस्तवाची आग न विझविल्याने याचे रूंपातर वणव्यात होते. पर्यायाने शेतीच्या बांधावर असलेली झाडी झुडपे तसेच मोठी झाडे या वणव्याच्या बळी पडल्याने वृक्ष संपदेची फारच मोठी हानी होते. अशा प्रकारच्या अनपेक्षितपणे लागल्या जाणा-या वणव्यांमध्ये कोणतीही काळजी न घेतल्याने त्याचे रूपांतर वणव्यात होऊन जंगलांचे तसेच मनुष्य वस्तीलाही आग लागुन जीवीत हानीचा धोका संभवतो.