। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
32 रायगड लोकसभा मतदार संघाची निवडणूक अत्यंत अटीतटीची राहील असे चित्र मतदार संघात फिरताना दिसून येत आहे. रायगडातील 15 तालुके आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, दापोली, खेड, मंडणगड या तालुक्यातील भाग रायगड लोकसभा मतदार संघात येत असल्याने निवडणुकीत कोण बाजी मारेल याचा अंदाज लावणे अवघड बनले आहे. तटकरे हे रायगडचे रहिवासी तर अनंत गीते रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी असल्याने कांटे की टक्कर होईल यात शंकाच नाही.
बुधवारी (दि.1) मंडणगड तालुक्यातील खडप निगडी या गावी कामानिमित्त जाण्याचा योग आला. यावेळी राजकीय कानोसा घेता असे दिसून आले की, या तालुक्यात निष्ठावान शिवसेनेची भक्कम फळी, कडवे उबाठा गटाचे शिवसैनिक ठाम असल्याने तटकरे यांना येथे मताधिक्यासाठी वाढण्यासाठी कडवी झुंज द्यावी लागेल. मुंबईतून देखील निष्ठावान शिवसैनिक येण्यास सुरुवात झाली असल्याचे गावागावांतून निगडीकडे जाताना दिसत आहे.
या भागात अनेक ठिकाणी तटकरेंना लोकसभा निवडणूक सोपी नाही. रत्नागिरी जिल्हा डोंगर दर्यांनी व्यापलेला प्रदेश असून शिवसेनेला मानणारा चाकरमान्यांचा वर्ग येथे मुळ राहणारा आहे. त्यामुळे खेडोपाडी शिवसेनेच्या शाखा दिसुन येतात. किंबहुना उद्धव ठाकरे यांना अधिक मानणारे कडवे शिवसैनिक आहेत, असे मंडणगड येथे ऐकायला मिळत आहे. रायगड लोकसभा मतदार संघात दापोली, खेड, मंडणगड, गुहागर भागात उबाठाचे अनंत गीते यांना आधिक मताधिक्य कसे मिळेल, यासाठी गावोगावी शिवसैनिकांनी कंबर कसली असून मुंबई/पुण्यातील चाकरमानी निष्ठावान शिवसैनिक 1 मे पासून गावी येऊ लागले आहेत. यामुळे आता गीते यांना वाढता पाठींबा मिळत असून मताधिक्य वाढेल, अशी माहिती शिवसैनिकांनी बोलताना दिली.
शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि मित्र पक्षाची भक्कम साथ आणि मुस्लिम बांधवाचा कल देखील उबाठाकडे दिसत असल्याने गीते यांना मोठा लाभ होण्याचे दिसून येत आहे. ही चुरशीची निवडणुक असल्याने कोणत्याही राजकिय पक्षाला आता फाजील आत्मविश्वास किंवा छोट्या गोष्टींकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही, अशी चर्चा मंडनगडच्या ग्रामीण भागात होत आहे. राजकारणात जेवढा भपका दिसतो तेवढा तो खरा नसतो, अशी अनुभवी मंडळींमध्ये चर्चा आहे. जनसंपर्क आणि खर्या कार्यकर्त्यांची भक्कम फळी यावरच निवडणुकीतील फलश्रुती अवलंबून आहे.