ममता बॅनर्जी यांचा सवाल
। पणजी । वृत्तसंस्था ।
जर एक गुजराती देशभर फिरू शकतो, तर एक बंगाली का फिरू शकत नाही? असा सवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी विचारला आहे. गोवा इथल्या असोनोरा भागात झालेल्या एका सभेदरम्यान त्या बोलत होत्या.
एक बंगाली देशाचे राष्ट्रगीत लिहू शकतो, पण गोव्यात येऊ शकत नाही? तुम्ही कधी हा प्रश्न उपस्थित केला आहे का की गांधीजी बंगाली आहेत की नाहीत, उत्तरप्रदेशातले आहेत की गोव्यातले? असे प्रश्न उपस्थित करत राष्ट्रीय नेता तोच असतो, जो सर्वांना सोबत घेऊन पुढे चालत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
तसेच तृणमूल काँग्रेस हा गोव्यातल्या नेत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्हे तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी गोव्याच्या राजकारणात उतरला असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.