। पाताळगंगा । वार्ताहर ।
तालुक्याच्या सर्वच ठिकाणी गुलमोहर बहरलेला असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात शेताच्या बांधावरती घरासमोर हा फुललेला गुलमोहर मानवी मनाला भुरळ घालत आहे.असा भास प्रत्येकाला जाणवत आहे. रणरणत्या उन्हामध्ये हा वृक्ष जणू लाल रंगांची शालू या गुलामोहारांनी परिधान केला कि काय? असा भास येथून जाणार्या वाटसरूला पडत आहे.
निसर्गाची किमया अतिशय हळुवार असते. मानवी मनावर एक समाधान देण्याचे काम निसर्ग करीत असतो. अशी भावना प्रत्येक निसर्ग प्रेमी व्यक्त करीत आहे. असा तप्त उन्हात फुललेला गुलमोहर प्रत्येकजण आपल्या जवळ असलेल्या मोबाईल मध्ये टिपण्याचे प्रयत्न करीत असतो. चैत्रामधील ऊन आणि वैशाखातला वणवा संपला की मग सुरू होतो तो मृग नक्षत्राचा गारवा. तेव्हा कुठे प्राणीमात्रांच्या जीवांची धगधग थांबते. पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये घनदाट सावली देणारा गुलमोहर उन्हाळ्यात मात्र लालबुंद फुलांनी बहरतो. मात्र या ऋतूत पाने गळून पडतात आणि फुले जोमाने वाढतात. उन्हामुळे अनेक प्रकारची गवत वाळून जातात. परंतु या उन्हात गुलमोहर आपले सौंदर्य सांभाळून ठेवण्यात तत्पर आहे.
या रणरणत्या उन्हात पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात असते.मग त्याला पाणी कुठून मिळते? आणि ते कसे फुलते? मात्र असे असले तरी हा सुद्धा निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल. या ऋतुमध्ये प्रत्येकाचे बहरणं, फुलणं आणि पुन्हा फळात रुपांतरीत होणे हे सृष्टीचे बदल पाहणे ही एक वेगळाच आनंद असतो. दरी-डोंगरावरती असे बहरलेले गुलमोहर आपली वेगळी ओळख सांगत असतात. हा फुललेला वृक्ष पाहून मानवी मनाला सुखद आनंद देत असतो असे निसर्ग प्रेमी म्हणत आहे.