शोभायात्रांची लगबग; स्वागतासाठी मिरवणुकांची तयारी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
हिंदू नववर्षाचे स्वागत महाराष्ट्रात गुढी उभारून करण्याची परंपरा आहे. शिवाय, साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त समजला जात असल्याने गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे नीरस वातावरणात पार पडलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्षांचे जंगी स्वागत यंदाच्या निर्बंधमुक्तीमुळे रायगड जिल्ह्यात जल्लोषात करण्यात येणार आहे.
संपूर्ण जिल्ह्यात विविध भागांत शोभायात्रा काढण्यात येणार असून, त्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. अलिबागसह संपूर्ण जिल्हाभरात मोठ्या उत्साहात शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी गुढीपाडव्यासंदर्भात सुधारित आदेश काढून निर्बंध शिथील करण्यात येणार असल्याचे सांगितले.
मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे टाळेबंदी, कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात येणार्या शोभायात्रा होऊ शकल्या नाहीत. आता कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा गुढीपाडवा दणक्यात साजरा करण्याची तयारी जिल्हाभर सुरू असून, विविध संस्थांचे कार्यकर्ते शोभायात्रांच्या तयारीत व्यस्त आहेत. अलिबाग शहरात विविध संघटनांच्यावतीने सकाळी 7.30 वाजता श्रीराम मंदिर ब्राह्मण आळी येथून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानिमित्त जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. तसेच नागाव येथेदेखील निखील मयेकर मित्र मंडळाच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात शोभायात्रा तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्राहकांना खरेदीचा मोह
गुढी उभारण्यासाठी आणि तिची पूजा करण्यासाठी प्रत्येक घरात जय्यत तयारी सुरू आहे. या पूजेसाठी लागणारी फुले, साखरेच्या माळा, दारावर तोरण, गोडधोड पदार्थ, बांबूची काठी आदी साहित्याने बाजारपेठा फुलल्या आहेत. मागील दोन वर्षे ठप्प असलेले व्यवहार यंदा निर्बंधमुक्तीमुळे सुरू झाल्याने बाजारपेठांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी तोबा गर्दी पाहायला मिळत असून, नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे.
झेंडू शंभरीपार
गुढीच्या सजावटीसाठी आवश्यक असणार्या झेंडूंच्या फुलांनी शंभरी पार केली असून, बाजारात 160 रुपये किलोने फुलांची विक्री करण्यात येत होती. तर, सफेद आणि पिवळी शेवंतीदेखील 200 रुपये किलोने विक्री करण्यात येत होती. अस्टरची एक जुडी 20 रुपये या दरात विक्री करण्यात येत होती. गुढीपाडव्यानिमित्त फुलांनी भाव खाल्ला असला तरी दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त सण साजरा करण्यात येत असल्याने ग्राहक मनसोक्त खरेदी करताना दिसून येत होते.