। मुंबई । वृत्तसंस्था ।
देशभरात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियान राबविले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्यानेही पूर्ण तयारी केली असून राज्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सर्वत्र विविध उपक्रमांनी हे अभियान साजरे केले जाणार आहे. 9 ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबवविणार येणार असून अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी दिली.
देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभर जय्यत तयारी सुरु झाली आहे. केंद्र शासनाने सन 2022 पासून हर घर तिरंगा अभियान सुरु केले. यावर्षी या अभियानाचे तिसरे वर्ष आहे. मागील दोन्ही वर्षी या अभियानात महाराष्ट्र राज्याने विविध उपक्रम राबविण्यात आघाडी घेतली. यावर्षीही तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविण्याबाबत केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याने केलेल्या तयारीची माहितीही खारगे यांनी यावेळी दिली.
13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट राज्य तिरंगामय
प्रत्येक नागरिकांनी दनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत त्यांच्या घरांवर तिरंगा फिडकवावा, यासाठी त्यांना राष्ट्रध्वज उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. राज्यभरात विविध शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान राबविले जाणार आहे. गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत तसेच राज्यस्तरावरही यानिमित्त रॅली, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, राष्ट्रध्वजासोबत सेल्फी, प्रतिज्ञावाचन असे विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. नागरिकांच्या अधिकाधिक सहभागाने हे अभियान निश्चितपणे यशस्वी करु, असे अपर मुख्य सचिव खारगे यांनी यावेळी सांगितले.