मातीच्या भांड्यांना सुगीचे दिवस

कुंभारकाम कारागिरांना रोजगार उपलब्ध

| पाली |वार्ताहर |

वाढते प्रदूषण, प्लस्टिकचा अतिरिक्त वापरामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. अशावेळी अन्न शिजविण्यासाठी पुन्हा एकदा मातीच्या भांड्यांचा वापर होताना दिसत आहे. परिणामी अन्नाची चव आणि पोषणतत्व टिकून राहत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी अशा विविध प्रकारची मातीची भांडी मिळत आहेत. त्यामुळे कुंभारकाम व्यवसायाला व कारागिरांना चांगला रोजगार उपलब्ध होत आहे.

पालीतील कुंभार व्यवसायिक नारायण बिरवाडकर यांनी मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणे आणि त्याचे फायदे सांगितले. ते म्हणाले की मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नाची चव, पौष्टिकता व सुगंध अधिक वाढतो. परिणामी सध्या अनेक लोक मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करणे पसंत करत आहेत. यामुळे मातीच्या भांड्यांना खूप मागणी आहे. त्यामुळे व्यवसाय देखील चांगला होतो. परिणामी मातीची भांडी व कुंभारकाम व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत.

अन्न शिजवण्याचे फायदे
मातीच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवताना अन्नातील पोषक तत्वे नष्ट होत नाहीत, त्याऐवजी ॲल्युमिनिअम किंवा स्टीलची भांडी वापरल्यास अन्न शिजवताना त्यातील अनेक पोषक तत्वे नष्ट होतात, परंतु मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करताना असे होत नाही. मातीच्या भांड्यात अन्नामध्ये असलेले सर्व पोषक तत्व योग्य प्रमाणात राहतात. मातीची भांडी निसर्गात क्षारीय असल्याने, ते अन्नातील आम्लताशी संवाद साधतात, त्यामुळे पीएच संतुलन करते आणि ते निरोगी बनवते. मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नाची चव अप्रतिम असते. अन्नाला एक वेगळ्या प्रकारचा गोड वास असतो. मातीच्या भांड्यात शिजवून अन्नामध्ये सर्व पोषक तत्वे चांगल्या प्रमाणात असतात, त्यामुळे पोटाच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो. मातीची भांडी लवकर गरम होतात, त्यामुळे अन्न शिजवताना इंधन कमी लागते. शिवाय तेल देखील कमी लागते.
विविध प्रकार
ज्योती कुंभार या व्यावसायिक महिलेने सांगितले की अन्न प्रकार व शिजवण्याची पद्धत यामध्ये मातीच्या भांड्यांचे विविध प्रकार येतात. ज्यामध्ये कचुले म्हणजे मातीचे टोप. झाकनणवाले व बिनझाकणेवाले असे दोन प्रकार यामध्ये येतात. साधारण दीडशे ते दोनशे रुपयांपासून पुढे मिळते. दही ठेवण्यासाठी मातीचे भांडे मिळते, याबरोबरच मातीचे तवे, मातीचे ताट, मातीचा कुकर व अगदी मातीचा फ्रीज शुद्ध उपलब्ध आहे. प्लास्टिक व धातूच्या बाटल्यांमध्ये पाणी पिण्यापेक्षा मातीच्या बाटलीत पाणी पिण्यास लोक अधिक पसंती देतात. यामध्ये पाणी गार राहते शिवाय पाण्याची चव मधुर लागते. मातीच्या बाटलीची किंमत दीडशे रुपयांपासून पुढे आहे.
राजस्थानी व्यावसायिक
जिल्ह्यात सध्या राजस्थान वरून येणारे व्यवसाईक सुद्धा अधिक आहेत. शहरात व गावागावात जाऊन हे व्यवसाईक मातीचे तवे व भांडी विकतात. प्रामुख्याने मातीचे स्वस्त तवे (50 रुपये) मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणतात. काही विक्रेते मुंबई बैंगलोर महामार्गावर चौक गावाजवळ बसलेले असतात.
किफायतशीर मातीची भांडी खिशाला परवडणारी आणि सहज उपलब्ध होणारी आहेत. शिवाय अधिक निगा राखण्याची आवश्यकता नाही. सहज विघटन देखील होते. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. तसेच आरोग्य देखील सदृढ राहते.

पूर्वी फक्त मातीचे माठ अधिक विक्री होत होती. पण आता मातीच्या भांड्यांचे महत्व कळू लागल्याने लोक मातीची विविध भांडी वापरत आहेत. हॉटेल व्यावसायिक देखील मातीच्या भांड्यांतील वेगवेगळे अन्नपदार्थ विक्री करत आहेत. परिणामी कुंभारकाम व्यवसायाला उभारी मिळाली आहे. मात्र परप्रांतीय व्यावसायिकांमुळे स्पर्धा वाढली आहे.

कल्पना कुंभार, व्यावसायिक, पाली
Exit mobile version