तुरुंगवारी टाळण्यासाठी ते भाजपत गेलेत- शरद पवार

। पुणे । प्रतिनिधी ।

तुरुंगवारी टाळण्यासाठीच राष्ट्रवादीची काही नेतेमंडळी भाजपसमवेत गेल्याचा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुणे येथे बोलताना केला. शरद पवार म्हणाले, ईडी कारवाईच्या भितीने आपल्या काही सहकाऱ्यांनी रस्ता बदलला आणि आज ते भाजपाच्या बाजूला जाऊन बसले आहेत. ते सांगतात ‘आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहोत, आम्ही आमची वैचारिक भूमिका बदलली नाही.’ परंतु, फक्त तुरुंगात जावं लागू नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे, अशी टीकाही त्यानी यावेळी केली.

राजकारणात किंवा समाजकारणात सत्याची कास सोडून कोणीतरी असं वागत असेल तर माझी खात्री आहे की आज ना उद्या अशा भेकड प्रवृत्तीच्या लोकांना सामान्य जनता वेगळ्या ठिकाणी पाठवल्याशिवाय राहणार नाही. त्यांना पुढे अडचण झाल्याशिवाय राहणार नाही.

शरद पवार, खासदार

शरद पवार म्हणाले, सध्या आपल्या राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. राज्यासमोर महागाई, बेकारी, वाढती गुन्हेगारी, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या किंमतीचा प्रश्न, उद्योगधंद्यांचे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. आपल्या राज्यातले उद्योगधंदे गुजरातला जात आहेत? राज्यातल्या अशा प्रत्येक प्रश्नासंदर्भात जनतेला आस्था आणि चिंता आहे. गेल्या सहा मिहिन्यात राज्यातले किती कारखाने गुजरातला गेले किंवा अन्य राज्यात गेले? तुम्ही गुजरातमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये कारखाने अवश्य काढा, परंतु जे कारखाने इथे येणार होते, महाराष्ट्रात येणार होते, ते तिकडे नेणं योग्य नाही. या कारखान्यांमुळे इथल्या तरुणांना कामाची संधी मिळणार होती. तो कारखाना तुम्ही इतर राज्यात नेला, त्यामुळे इथल्या म्हणजेच महाराष्ट्रातल्या तरुणांचा रोजगार गेला, अशा प्रश्नांसंदर्भात आता आपण बोललं पाहिजे, असे ते म्हणाले.

Exit mobile version