। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळीच्या वेशीवर पुन्हा कचर्याचे ढीग दिसून येत आहेत. यापूर्वी टाकलेल्या कचर्याची विल्हेवाट पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने लावून ध्वनीक्षेपाद्वारे जनजागृती करूनसुद्धा वेशीवर कचरा आणून टाकला जात आहे. मॉर्निंगवॉकच्यानिमित्त साधून हा कचरा काही सुशिक्षित नागरिकांकडूनच टाकला जात असल्याची चर्चा असून ग्रामपंचायतीच्या स्वच्छता जनजागृतीला त्यांच्याकडून ठेंगा दाखवण्यात येत असल्याचे चित्र आहे. घनकचरा व्यवस्थापनामध्ये जिल्हास्तरावरून नीला पॉलिकॅप व ऑल इंडिया या दोन कंपन्यांना ठेका देण्यात आला आहे. प्रत्येक गावाचा घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत डीपीआर तयार करून सार्वजनिक शोषखड्डे, वैयक्तिक शोषखड्डे, सार्वजनिक कुंड्या, कचरा संकलन, इलेक्ट्रिकवर चालणार्या सायकलही दिली आहे.
पोस्टर व बॅनरबाजीने स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. स्पीकरवरून कचरा उघड्यावर टाकू नये, कारवाई केली जाईल, असा संदेशही निरूपयोगी ठरत आहे. पाटपन्हाळे गावच्या शृंगारतळी हद्दीत कचरा जमा करणारी घंटागाडी रोज फिरत असते. कित्येक नागरिक हातात कचरापेटी घेऊन घंटागाडीत कचरा टाकण्यासाठी रस्त्यावर उभे असतात आणि कचरा घंटगाडीत टाकतात. त्याच हद्दीत जानवळे फाटादरम्यान, रस्त्यालगत कचर्याचे ढीग कसे काय तयार होतात, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.