| रत्नागिरी | प्रतिनिधी |
हवामान विभागाने राज्यात पावसाचा यलो अलर्ट दिला होता. दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील सिंधुदुर्ग आणि गोव्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला आहे. अचानक पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अवकाळीमुळे उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला असला तरी शेतीचे नुकसान झाले आहे. पुढील 24 तासांत अवकाळीच्या या स्थितीत सुधारणा होणार असून, दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार शनिवारपासून राज्यात पुन्हा अवकाळीसाठी पूरक वातावरनिर्मिती होणार आहे. तसेच सांगली, सोलापूर मध्ये पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्याच्या उर्वरित भागांमध्ये मात्र सूर्याचा दाह कायम राहणार असून, त्यात काही अंशांची वाढसुद्धा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या छत्तीसगडपासून सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा कर्नाटकच्या अंतर्गत भागासह तामिळनाडूच्या दक्षिणेकडेही परिणाम करताना दिसत आहे. यामुळे विदर्भात बहुतांश क्षेत्रांमध्ये तापमान 38 ते 39 अंशांवर असून, उत्तर महाराष्ट्रातही तापमान वाढीस सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर भागांमध्येही उष्मा वाढत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर या उकाड्याचा परिणाम होताना दिसत आहे. राज्यात मागील 12 तासांमध्ये हवामानात झालेल्या बदलांचा परिणाम पुढील 24 तासांमधील हवामानावर होणार असल्यामुळे कमाल आणि किमान तापमानामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे.