भारताने केला ऑस्ट्रेलियाचा पराभव
| मुंबई | वृत्तसंस्था |
भारतीय महिला क्रिकेट संघाने आज इतिहास रचला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या ऑस्ट्रेलियासोबतच्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव केला . भारताचा हा ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघावरील कसोटी क्रिकेटमधील पहिला विजय आहे. चौथ्या दिवशी भारताला विजयासाठी 74 धावांची गरज होती. हे माफक आव्हान भारताने 2 गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. भारताच्या दुसऱ्या डावात स्मृती मानधनाने 38 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 तर दुसऱ्या डावात 261 धावा केल्या होत्या. भारताने पहिल्या डावात 406 धावा केल्या.
भारताने बलाढ्य इंग्लंडला कसोटी सामन्यात पराभूत केल्यानंतर त्यांचा मुकाबला महिला क्रिकेटमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघासोबत होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 219 धावा केल्या. भारताकडून पूजा वस्त्रकार आणि स्नेह राणा यांनी भेदक मारा केला. पूजाने 4 गडी बाद केले तर स्नेह राणाने 3 फलंदाज बाद केले. या दोघींना दिप्ती शर्माने 2 गडी बाद करीत चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून ताहिला मॅग्राथने सर्वाधिक 50 धावा केल्या होत्या.
भारताने प्रत्युत्तरात खेळताना आपल्या पहिल्या डावात दमदार बॅटिंग करत 406 धावा ठोकल्या. भारताकडून तब्बल चार फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. मात्र एकाही फलंदाजाला शतकी मजल मारता आली नाही. सलामीवीर स्मृती मानधनाने 106 चेंडूत 74 धावा तर दिप्ती शर्माने 171 चेंडूत 78 धावा ठोकल्या. जेमिमाह रॉड्रिग्जने 73 धावांची खेळी केली. भारताकडून रिचा घोषने 52, शेफाली वर्माने 40 तर पूजा वस्त्रकारने 47 धावांचे योगदान दिले. भारताने पहिल्या डावात 187 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डावात कडवी झुंज देण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र कांगारूंनी 4 बाद 206 धावा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केलं. स्नेह राणाने 4 तर राजेश्वरी गायकवाड आणि कर्णधार हरमनप्रीतने प्रत्येकी 2 गडी बाद करीत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 261 धावात संपवला. ऑस्ट्रेलियाकडून ताहिला मॅग्राथने सर्वाधिक 73 तर एलिसा पेरीने 43 धावांची खेळी केली. भारताने ऑस्ट्रेलियाला 261 धावात गुंडाळल्यानंतर विजयासाठी 74 धावांचे माफक आव्हान मिळाले होते. चौथ्या दिवशी भारतीय संघाने हे आव्हान 2 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं. स्मृती मानधना आणि रिचा घोषने दुसऱ्या गड्यासाठी 51 धावांची भागीदारी रचली. स्मृतीने नाबाद 38 धावा केल्या तिने चौकार मारत सामना संपवला.