बाल कर्करोगग्रस्तांना हक्काचे निवासस्थान
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
टाटा मेमोरियल सेंटरच्या एसीटीआरईसी यांच्या सहकार्याने सेंट जूड इंडिया चाइल्डकेअर सेंटर्सने खारघरमध्ये सर्वात मोठ्या ‘होम अवे फ्रॉम होम’ सुविधा मोफत मिळणार आहे. टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांच्या उपस्थितीत शनिवार, दि. 22 नाव्हेंबर रोजी 12 मजली, 234 युनिट्सच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे दरवर्षी बालकर्करोगाशी सामना करणाऱ्या 700 हून अधिक कुटुंबांना मोफत व स्वच्छ निवास उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पुढील 20 वर्षांत ही सुविधा अंदाजे 14,000 कुटुंबांना मदत करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बालकर्करोगाचे उपचार अनेक वर्षे चालू शकतात आणि त्यासाठी वारंवार फॉलो-अपची गरज भासते. उपचारासाठी हजारो किलोमीटर प्रवास करून मुंबईत येणाऱ्या कुटुंबांसाठी राहण्याची व्यवस्था करणे ही एक मोठी अडचण असते. सेंट जूड्समध्ये राहणाऱ्या कुटुंबांना त्यांचे मूल पूर्णपणे कॅन्सरमुक्त होईपर्यंत सुरक्षित राहण्याची हमी दिली जाते. ही नवी सुविधा कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या कोणत्याही मुलाला सुरक्षित आणि काळजी घेणारी राहण्याची जागा मिळालीच पाहिजे, या सेंट जूड्सच्या वचनाची साक्ष आहे. परवडणारी राहण्याची सोय नसल्यामुळे अनेक कुटुंबे उपचार अर्धवट सोडतात. परंतु, या सुविधेमुळे पीडित कुटुंबावर उपचार मध्येच सोडण्याची वेळ येणार नाही. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या माहितीनुसार, सेंट जूड्सच्या केंद्रांमुळे उपचार अर्धवट सोडण्याचे प्रमाण 2000 च्या सुरुवातीला 30 टक्क्यांपेक्षा जास्त होते, ते आता 5 टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. या सुविधेत लायब्ररी, क्लासरूम, स्किलिंग सेंटर आणि ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ असेल, जे इतर स्वयंसेवी संस्थांना देशभरात ‘होम अवे फ्रॉम होम’सारखी केंद्रे उभारण्यासाठी आणि चालवण्यासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण देणार आहे.
खारघर येथील हे केंद्र फक्त एक सुविधा नाही, हे एक वचन आहे. भारतातील कोणतेही मूल झोपण्यासाठी, जेवण्यासाठी किंवा सन्मानाने बरे होण्यासाठी जागा नसल्यामुळे कॅन्सरविरुद्धचा संघर्ष हरू नये. एका छताखाली 234 युनिट्ससह आम्ही फक्त कुटुंबांना राहण्याची सोय करत नाही, तर आम्ही भविष्यसुद्धा वाचवत आहोत.
–मनीषा पार्थसारथी, अध्यक्ष
सेंट जूड इंडिया चाइल्डकेअर सेंटर्स
सेंट जुड्ससोबत उभा करत असलेला नवीन 12 मजली ब्लॉक 234 पेक्षा जास्त मुलांसह त्यांच्या पालकांसाठी राहण्याची सोय देईल. यामुळे अधिक रुग्ण आमच्यासोबत राहून वेळेवर उपचार घेऊ शकतील. कॅम्पसच्या आत राहण्यामुळे, मध्यरात्री एखाद्या मुलाला अचानक त्रास झाला तरी, फक्त सुमारे 100 मीटर चालून हॉस्पिटलमध्ये पोहोचता येईल, जिथे तात्काळ उपचार मिळतील. मला फक्त उत्तम निकाल आणि मुलांबरोबर त्यांच्या पालकांच्या एकूण कल्याणात मोठा सुधारणा होईल असे दिसते.
–डॉ. पंकज चतुर्वेदी,
संचालक, एसीटीआरईसी







