मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीत घरगणना अंतिम टप्प्यात

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड-जंजिरा नगर परिषद हद्दीत भारत सरकारच्या जनगणना 2027 अभियानांतर्गत घरगणनेचे काम दि.16 मेपासून सुरू करण्यात आले असून दि.14 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचले असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मुरुड-जंजिरा नगर परिषदेमार्फत मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली घरगणनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मोहिमेसाठी जनगणना विभागामार्फत विशेष नियोजन करण्यात आले असून शहरातील प्रत्येक घर, कुटुंब व इमारतींची माहिती संकलित केली जात आहे.

या कामासाठी अनिकेत भोसले व जनगणना लिपीक सुदेश माळी यांच्या समन्वयातून एकूण 20 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पर्यवेक्षणासाठी आशितोष पाटील, सतेज निमकर आणि राजेश भोईर, जयकृष्ण भिसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून सर्व कामकाजावर नियमित देखरेख ठेवण्यात येत आहे.

घरगणनेदरम्यान प्रत्येक घरातील सदस्य संख्या, घराची स्थिती, उपलब्ध मूलभूत सुविधा, इमारतींचा प्रकार, पिण्याचे पाणी, स्वच्छता यासह विविध बाबींची माहिती संकलित केली जात आहे. ही माहिती भविष्यातील शासकीय योजना, नागरी सुविधा, विकास आराखडे तसेच विविध कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नगर परिषद प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, प्रगणक व पर्यवेक्षक घरभेटी दरम्यान भेट देत असताना त्यांना अचूक व आवश्यक माहिती द्यावी तसेच जनगणना प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी पूर्ण सहकार्य करावे. जनगणना ही राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून त्यामध्ये नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Exit mobile version