पाचव्या कसोटीसाठी धरमशालातील वातावरण इंग्लिश संघाला पोषक
। धरमशाला । वृत्तसंस्था ।
निसर्गरम्य आणि डोंगरांच्या कुशीत असलेल्या धरमशाला येथील पाचवा कसोटी सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांतील खेळाडूंसाठी वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे. हिमालय आणि आसपासच्या परिसरात अजूनही बर्फ पडत असल्यामुळे धरमशालेतील कमीत कमी तापमान 8 अंश सेल्सियस आहे. भारतीय खेळाडू मायदेशात खेळत असले, तरी त्यांच्यासाठी हे अगदीच थंड वातावरण असल्यामुळे त्यांचा कस लागू शकतो.
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 3-1 विजयी आघाडी घेतलेली असली, तरी शेवटच्या धरमशाला कसोटी सामन्याला डेड रबर म्हणण्याची तयारी दोनही संघ दाखवणार नाहीत. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जाण्यासाठी प्रत्येक कसोटी सामना मोलाचा असल्याने अंतिम कसोटी सामन्यासाठी भारत आणि इंग्लंडचे संघ तयार झाले आहेत.
हिमाचल प्रदेशात वसलेल्या धरमशाला गावी आल्यावर नेहमीप्रमाणे सामन्याच्या दोन दिवस अगोदर भारत आणि इंग्लंड दोनही संघांनी जोरदार सराव केला. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर खेळाडू क्रिकेट सामन्याच्या तयारीला लागल्याने एक प्रकारचा उत्साह खेळाडूंच्या हालचालीत दिसत होता. सर्वाधिक तापमान 17 अंश आणि सर्वात कमी 8 अंश तापमान म्हटल्यावर भारतीय संघातील खेळाडूंना हुडहुडी भरते आहे; तर इंग्लंडच्या खेळाडूंना घरी आल्याचा भास होतो आहे.
धरमशाला कसोटी सामन्यात अश्विन आणि जॉनी बेअरस्टो आपापला 100 वा कसोटी सामना खेळणार आहेत. एकूण सात वेळा आणि या मालिकेत दोन वेळा अश्विनकडून बाद झालेला ज्यो रूट म्हणतो, अश्विन नेहमी वेगवेगळे चेंडू टाकून फलंदाजाला विचारात ठेवतो, की आता तो नवीन काय करेल. प्रत्येक चेंडू टाकताना अश्विन विचार करतो, हे नक्की. अश्विनकडे बॅटची बाहेरची आणि आतली कड पकडून फलंदाजाला बाद करायची नामी कला असल्याचेही रूटने कबूल केले. रांची सामन्यात जेम्स फोक्सला कॅरम बॉल टाकून अश्विनने बाद केले होते, हेसुद्धा इंग्लंडचे फलंदाज विसरलेले नाहीत.
मैदानावरील उणिवा दूर?
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेदरम्यान धरमशाला स्टेडियमवरील मैदानाच्या राखणीवरून बराच वादंग झाला होता. क्षेत्ररक्षण करताना खेळाडूंचे पाय अडकत होते, इतकी आऊटफिल्डची अवस्था खराब होती. तीन महिने मैदानाची मशागत करणार्या कर्मचार्यांनी उणिवा भरून काढण्यासाठी केलेले प्रयत्न किती कामी आले आहेत, याचा अंदाज पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी येणार आहे.
खेळपट्टीचा अंदाज उद्याच कळणार
दोन दिवस अगोदर मैदानावरच्या खेळपट्टीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न दोनही बाजूच्या खेळाडूंनी केला असला, तरी खरा अंदाज सामन्याच्या दिवशीच येणार आहे. अर्थातच खेळपट्टी कितीही फलंदाजीला पोषक किंवा फिरकीला साथ देणारी बनवली, तरी थंडगार हवामानाचा फायदा इंग्लंडचे वेगवान गोलंदाज नक्कीच उचलू शकतात. अर्थातच जसप्रीत बुमराह संघात परतल्याने वेगवान गोलंदाजीची भारताची धार नव्याने दिसणार आहे.