आ. जयंत पाटील यांचा संतप्त सवाल
| रायगड | खास प्रतिनिधी |
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद आता राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाला अजून किती रक्त सांडावे लागणार आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने लाखोंच्या संख्येचे 53 मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चाची दखल जगाने घेतली. पण, आपल्या येथील राज्यकर्त्यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनांकरवी अमानुषपणे लाठीचार्ज केला. या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत. संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर सरकार अशी कठोर भूमिका कशी काय घेऊ शकते. सरकारची ही कोणती हुकूमशाही पद्धत रुढ होत चालली आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. जालना येथील लाठीचार्ज पाहून ब्रिटिश सरकारचा काळ आठवला. आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी उभे आहोत, असे आ. पाटील यांनी सांगितले.