वरंडोली येथील पुलाचा भाग कोसळला
| महाड | प्रतिनिधी |
किल्ले रायगड ते महाड या मार्गावरील वरंडोली गावाजवळ असलेल्या नाल्यावरील पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे, त्याचबरोबर पुलाच्या पिलर्सना तडे गेल्याने पूल केव्हाही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. किल्ले रायगडकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने पूल कोसळल्यास या परिसरातील बहुतांशी गावांचा संपर्क तुटणार असल्याने पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी किल्ले रागयडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावचे माजी सरंपच रघुवीर देशमुख, राजेंद्र खातू, गणेश अवकीरकर यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे.
महाड तालुक्यामध्ये गेल्या चार दिवसा पासुन मुसळधार पावसाने जनजीवन पुर्णपणे विस्ककीत झाले असुन ग्रामिण भागांतील नदी नाल्यांना पुराचे पाणी आले आहे. वरंडोली गावाजवळून वाहणारा आणि गांधारी नदीला जोडणार्या नाल्यावर पूल असून, या पुलावरुन किल्ले रायगडकडे जाणारी वाहतूक केली जाते. या पुलाच्या काही पिलर्सना तडे गेले असून, पूल केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. पूल नादुरुस्त झाल्याची माहिती सर्वत्र पसरताच महाडच्या प्रांताधिकारी प्रतिभा पुदलवाड यांनी त्वरित दखल घेऊन महामार्ग बांधकाम विभागाला कळविण्यात आले. त्याचप्रमाणे तहसीलदार सुरेश काशिद यांनी घटनास्थळी भेट देऊन नादुरुस्त पुलाची पाहणी केली.
वरंडोलीचा पूल जीर्ण झालेला असून, या मार्गावरुन दर दिवशी हजारो वाहने जात- येत असतात. पावसाळ्यापूर्वी पुलाची दुरुस्ती, स्ट्रक्चरल आडिट करणे गरजेचे असताना, महामार्ग विभागाकडून अक्षम्य हलगर्जीपणा झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या मार्गावरील सर्व पुलांची पाहणी करुन आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी, त्याचबरोबर वरंडोली पुलाची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी अन्यथा पूल कोसळल्याने किल्ले रायगडकडे जाणारी वाहातूक बंद करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले.