अखेर, प्रलंबित प्रश्न सुटलाच
। मुंबई । विशेष प्रतिनिधी ।
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मच्छी विक्रेत्यांचा गेल्या 25 वर्षांतील प्रलंबित प्रश्न अखेर सुटला आहे. नुकताच भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेल, महाराष्ट्र राज्य तथा कोळी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मच्छीमार समाजातील व्यावसायिकांना माजी मंत्री आ. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अधिकृत परवाने देण्यात आले आहेत. याप्रसंगी, कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे सदस्य आ. रमेश पाटील व भाजपा मच्छीमार सेलचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अॅड.चेतन पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत अॅड. चेतन पाटील, मच्छिमार बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी शॅक्स ऑन बीच, स्पीड बोटिंग, फिश ऑन व्हीलच्या माध्यमातून रोजगार देण्यासाठी तसेच पंतप्रधान मस्यसंपदा योजनेतून मच्छिमार बांधवांना लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन केले आहे.
याशिवाय, कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांचे प्रलंबित प्रश्न व समस्या येत्या काळात सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. या कार्यक्रमाला कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, माजी नगरसेवक सुभाष बाबडे, रेखा चौधरी, अॅड.भावेश पाटील, राजू कोट, सुभाष कोळी, शक्ती भोईर, संजय चौधरी, सचिन कोळी, शाहीर भंडारी, गुरुनाथ काळे, वर्षा कोणकर, रुपेश किनकर, ज्ञानेश्वर ओवळेकर, संतोष पाटील, अॅड. मोरेश्वर पाटील तसेच कोळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.