। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील नागरी समस्यांच्या बाबतीत कर्जत शहर बचाव समिती गेली सहा महिने सातत्याने आवाज उठवत आहे. या समितीच्या माध्यमातून कर्जत नगरपरिषदेकडे देण्यात आलेल्या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद पालिका प्रशासन देत नसल्याचे दिसून येत आहे. कर्जत शहरातील नागरी सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून या समस्यांवर पालिकेने लक्ष वेधून नागरी समस्यांवर मार्ग काढावा, यासाठी नागरिकांनी पालिकेला अर्ज केले होते. मात्र, पालिका प्रशासनाने या अर्जांना केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे अॅड. कैलाश मोरे यांच्या संयोजनाखाली कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून पालिकेच्या विरोधात साखळी उपोषणाचा मार्ग हाती घेण्यात आला आहे. दरम्यान, रविवार पासून कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून महिलांनी देखील या उपोषणात सहभाग नोंदविला आहे.