निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा, मास्क वापरा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन


। मुंबई । वार्ताहर ।
राज्यात करोना पुन्हा डोके वर काढत असून, दैनंदिन रुग्णांची संख्या वाढत आहे. पुढील १५ दिवस महत्त्वाचे असून, शासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे. पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करावा, स्वयंशिस्त पाळावी, लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना उद्देशून केले. रुग्णसंख्या वाढल्यास प्रसंगी कठोर निर्णय घेण्याचा इशाराही ठाकरे यांनी दिला.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: मुंबई, ठाणे, पुणे अशा महानगरांमध्ये दैनंदिन बाधितांचा आकडा झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेसह सरकारचीही चिंता वाढली आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी तातडीने करोना नियंत्रण कृती गटाशी चर्चा केली. ठाकरे यांच्या वर्षां निवासस्थानी झालेल्या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह कृती गटाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. अजित देसाई, डॉ. बजान, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. तात्याराव लहाने आदी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून सहभागी झाले होते.


करोनाचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. करोना कालावधीत उभारण्यात आलेली तात्पुरती रुग्णालये सज्ज ठेवण्याच्या सूचना ठाकरे यांनी यावेळी दिल्या. या रूग्णालयांचे त्यांचे संरचनात्मक परीक्षण करुन घ्यावे. या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी आहेत का, आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का याचा आढावा घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या. करोना चाचण्यांचे प्रमाण वाढवा तसेच करोना विषाणूचा नवीन उत्परिवर्तीत प्रकार आहे का, असल्यास त्याची संसर्ग क्षमता किती आहे, यावर लक्ष ठेवा, पायाभूत सुविधांची तयारी करुन ठेवा, प्राणवायू, औषधे यांचा साठा करुन ठेवा. तसेच येणाऱ्या पावसाळय़ामुळे जलजन्य आजार देखील डोके वर काढतात, त्यांची लक्षणे करोना सारखीच असल्याने डॉक्टरांनी देखील अशा रुग्णांना वेळीच करोना चाचण्या करून घेण्यास सांगावे,अशा सूचनाही त्यांनी आरोग्य विभागास दिल्या. राज्यात लवकरच शाळा सुरू होतील. शाळेच्या बाबत जागतिक स्तरावर काय निर्णय घेतले गेले आहेत, तेथील मुलांना संसर्ग होण्याची स्थिती काय आहे, याबाबत माहिती घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी डॉ प्रदीप व्यास यांनी राज्यातील करोना विषाणूच्या संसर्गाबाबत सविस्तर माहिती दिली. १६ एप्रिल रोजी राज्यात सर्वात कमी ६२६ सक्रिय रुग्ण होते. आता दीड महिन्यात त्यात सात पटीने वाढ झाली असून ती संख्या ४५०० वर गेली आहे. मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या ९७ टक्के रुग्ण आहेत. मुंबईचे बाधित प्रमाण ६ टक्के असून राज्याचे देखील हे प्रमाण वाढून ३ टक्के झाल्याचे व्यास यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन..

१. ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तत्काळ करोना चाचणी करुन घ्या.

२. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी आवर्जून वापरा.

३. बारा ते अठरा वयोगटातील लसीकरण वाढवा.

४. ज्येष्ठ, सहव्याधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, वर्धक मात्रा घ्यावी.

Exit mobile version