सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

| उरण | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा कारभार ढिम्म व वेळ काढू झाला असून, या अनागोदी कारभारामुळे जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचे विविध अनिर्णित प्रश्न चार दशकाच्या कालावधीत दुर्लक्षित राहिल्याची खंत निवृत्त शिक्षक संघाचे ज्येष्ठ नेते दा. चां. कडू यांनी व्यक्त केली आहे.

उरण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील निवृत्त शिक्षकांचे अनेक प्रश्न 40 वर्षांत सुटू शकले नाहीत. निवृत्त शिक्षकांना न्याय देण्याऐवजी त्यांचे प्रलंबित प्रश्न कसे सुटणार नाहीत, याचीच व्युहरचना रायगड जिल्हा परिषदेच्या आणि उरण पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकारी वर्ग करीत असल्याने हा जिल्ह्यातील वयोवृद्ध निवृत्त शिक्षकांचा घोर अपमान असल्याचे शिक्षक नेते कडू यांनी स्पष्ट केले आहे.

सेवानिवृत्त शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करणे, 31 मार्च 1995 रोजी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या पेन्शनची परिगणना करताना मूळ वेतनात 20 टक्के ऐवजी 97 टक्के महागाई भत्ता अधिक करून पेन्शन निश्चित करणे, निवृत्त शिक्षकांची गहाळ झालेली सेवापुस्तके उपलब्ध करणे, दिनांक 1/1/1996 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या पदोन्नती मुख्याध्यापकांना 3250 रुपये सुधारीत पेन्शन मंजूर करणे, निवड श्रेणी मंजूर केलेल्या शिक्षकांना सुधारीत पेन्शन मंजूर करणे, अनुभवी ट्रेण्ड शिक्षकांना प्रशिक्षित समजून त्यांना वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतन मंजूर करणे, बढतीच्या पदाला मानीव वेतन वाढ मंजूर करणे, 1932 पात्र निवृत्त शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करणे आदी निवृत्त शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न असून, ते अनिर्णित ठेवून वयोवृद्ध निवृत्त शिक्षकांना आर्थिक लाभापासून उपेक्षित ठेवण्याचे धोरण जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्यांचे शिक्षण विभाग राबवित असल्याने शिक्षक नेते कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खोपटे, तालुका उरण येथे झालेल्या निवृत्त शिक्षक संघाच्या सभेच्या निमित्ताने कडू यांनी आपल्या भावना व्यक्त करून संघटनेनी आंदोलन केल्याशिवाय शिक्षण विभागाला जाग येणार नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी तालुका संघाचे अध्यक्ष अंकुश पाटील, उपाध्यक्ष नामदेव म्हात्रे, सरचिटणीस महादेव ठाकूर, खजिनदार बाळाराम तांडेल, जिल्हा संघाचे सदस्य सदानंद कोळी, नारायण पाटील, गो.सि.पाटील, वर्षा म्हात्रे, राजेश्री भगत आदी उपस्थित होते.

Exit mobile version