वाघ आणि मानव संघर्ष थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना अंमलात आणा

शेतकरी कामगार पक्षाची मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडे केली मागणी

गडचिरोली | प्रतिनिधी |

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, सावली,मुल तालुक्यातील मागील दोन वर्षांपासून शेकडो नागरिकांवर वाघांनी हल्ले केलेले आहेत.यात अनेकांना जीव गमवावे लागले आहेत.विशेषत: गडचिरोली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सुमारे १५ नागरिकांना ठार केले असून अनेकांना जखमी केले आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या शेकडो पाळीव जनावरांवरही वाघांचे हल्ले झालेले आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरे आणि माणसांवर झालेले वाघांचे हल्ले बघता वाघ आणि मानव असा या भागात संघर्ष उभा ठाकलेला असल्याने सदरचा संघर्ष थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना अंमलात आणा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जिल्हा सहचिटणीस भाई रोहिदास कुमरे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष भाई सुनील कारेते यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सदरच्या परिस्थिती संबंधाने शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आम्ही परिसरातील अनेक जेष्ठ नागरिक,मृतांचे नातेवाईक, वन्यजीव अभ्यासक व जल, जंगल, जमीन संबंधातील स्थानिक तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केल्यानंतर वाघ आणि मानव संघर्षाबाबतची वास्तव परिस्थिती आढळून आली आहे. त्यानुसार सदरच्या मागण्या आपल्याकडे करण्यात येत असून त्या तात्काळ प्रभावाने अंमलात आणाव्यात अशी विनंती केलेली आहे.

वाघ,बिबटे आणि अन्य वन्यजीवांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबातील एकाला तात्काळ वनविभागात नोकरी देण्यात यावी. तसेच जखमींना सध्या असलेल्या योजनेच्या दिडपट व तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी. वनहक्क मान्यता अधिनियम २००६ च्या कलम २ (ण) नुसार दि.१३ डिसेंबर २००५ पुर्वीच्या जोत असलेले वन अतिक्रमण कायम करावे. त्यानंतर हव्यासापोटी जंगल तोड करुन गैरमार्गाने मिळविलेले वनहक्क तात्काळ पडताळणी करून रद्द करण्यात यावेत. व अशा वनजमीनी ताब्यात घेऊन कॅम्पा फंडातून पुनर्वनिकरण निर्मीती करण्यात यावी. यासाठी तात्काळ विशेष मोहीम राबविण्यात यावी. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाचे व्यापारीकरण (हाॅटेल,रिसाॅर्ट चे बेसुमार परवानग्या ) थांबविण्यात यावे. व वन्यजीवांना होणारा त्रास थांबविण्यावर उपाययोजना कराव्यात. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ढिवर समाजातील टसर उत्पादकांना त्यांचे पारंपरिक कोसारानांचे जंगल वनहक्क मान्यता अधिनियम २००६ च्या कलम २- (१),(क),(ग) व (घ) अन्वये मालकी हक्काने टसर उत्पादनाकरीता देण्यात याव्यात.(ज्यामुळे जंगल कायम राहून झुडुपांचे व्यवस्थापन होईल.इतर वन्यजीवांची वाघ, बिबट्यांना शिकार करणे सहज शक्य होईल. परिणामत: या जंगलांमध्ये सध्या वाघांचे माणसांवर होत असलेले हल्ले थांबतील.) गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, धानोरा, एट्टापल्ली,भामरागड, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी समुदाय राहत असल्याने व त्यांचे नैसर्गिकरित्या वन्यजीवांशी असलेले समन्वय आणि याच तालुक्यांमध्ये वाघ, बिबटे आणि अन्य वन्यजीवांच्या वस्तीसाठी योग्य जंगल असल्याने या परिसरातील जंगलात बंदुकधारी पोलीसांचा रात्रंदिवस असलेला अतिरिक्त वावर थांबविण्यात यावा. तसेच कोरची आणि एट्टापल्ली तालुक्यातील १४,९५० हेक्टर जंगलावरील बेकायदा मंजूर आणि प्रास्तावित लोह खाणी ताबडतोब रद्द करण्यात याव्यात. जेणेकरून येथे वाघ,बिबट्यांना वावर (येथे पुर्वी अधिवास होतेच) करणे शक्य होईल. अन्यथा ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाढीव वाघ,बिबटे हे चिमूर, ब्रम्हपुरी,सावली, मुल, गडचिरोली,आरमोरी,वडसा,चामोर्शी तालुक्यातील वस्त्यांमध्ये जाऊन धुळघूस घालतील.गडचिरोली तालुक्यातील १३ व्याघ्र बळी ही त्याची सुरुवात आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कर्मचारी वन्यजीव कायद्याला अनुसरून तात्काळ वाढविण्यात येवून पदभरती घेण्यात यावी. तसेच गडचिरोली वनवृत्तातील अवैध वृक्षतोड, सागवान तस्करी, ग्रामसभांच्या हक्कांचे हनन, दि.१३ डिसेंबर २००५ नंतरच्या अतिक्रमणाला अवैधपणे पट्टे देण्याच्या परिस्थितीवर नियंत्रण न ठेवणे आणि गडचिरोली तालुक्यात वाघांनी केलेले माणसांवरील हल्ले प्रकरणात डोळेझाक करून कर्तव्यात कसूर करणारे मुख्य वनसंरक्षक श्री.मानकर यांची अन्यत्र हकालपट्टी करण्यात यावी. व जबाबदार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी नियुक्त करण्यात यावा. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना वनसंवर्धन आणि संरक्षणार्थ कार्यात सहभागी करण्यात यावे.

ग्रामसभा, ग्रामपंचायतींना विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात यावा. वनविभागाच्या योजनांमध्ये त्यातून पारदर्शकता आणण्यात यावी. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलांवर आधारित FSEZ (Forest Special Economic Zone) निर्माण करण्यात येवून स्थानिकांना रोजगार निर्मितीची हमी देण्यात यावी. चिमूर, ब्रम्हपुरी, सावली, मुल आणि गडचिरोली,आरमोरी,वडसा, तालुक्यातील वाघांना जेरबंद करण्यासाठी पुर्णवेळ पथकाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणीही शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा सहचिटणीस भाई रोहिदास कुमरे, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर, उराडे महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष भाई सुनील कारेते यांनी केली आहे.

सदर पत्राच्या प्रती राज्याचे मुख्य सचिव, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव, राज्याचे प्रधान मुख्य संरक्षक, वनविभाग ( वन्यजीव), प्रधान मुख्य वनसंरक्षक, जिल्हाधिकारी गडचिरोली, चंद्रपूर यांनाही मेल द्वारे पाठविण्यात आलेले आहे.

Exit mobile version