बैलगाडी चालकांना शेकापचे संरक्षण
चित्रलेखा पाटील यांची घोषणा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
बैलगाडी शैर्यतीदरम्यान अपघात झाल्यास जखमीला त्वरित आणि नि:शुल्क उपचार मिळून संबंधितांचा जीव वाचावा यासाठी शेतकरी कामगार पक्ष प्राथमिक उपचाराचा खर्च देणार, अशी घोषणा जिल्हा महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केली. तसेच बैलगाडी शर्यतींची पूर्वसूचना दिल्यास त्याठिकाणी शेकापची अॅम्ब्युलन्स सेवाही दिली जाणार आहे. बैलगाडी शर्यती सुरु व्हाव्यात, यासाठी शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी वेळोवेळी हा प्रश्न राज्य सरकारकडे लावून धरला होता.
रायगड जिल्ह्यात अनेक बैलगाडीप्रेमी चालक मालक आहेत. आपल्या बैलजोडीवर नितांत प्रेम करणार्या आणि बैलगाडी शर्यतीत आन, बाण आणि शान समजून उतरणार्या चालक मालक बांधवांच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्ष कायम उभा राहिला आहे. शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी कायम बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी, हा प्रश्न सरकारपुढे उचलून धरला आहे. आज ते स्वप्न साकार झालेले असतानाच पुन्हा एकदा शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी बैलगाडी चालक मालकांच्या भल्याची एक घोषणा केली. अधिकृत बैलगाडी शर्यतीत अपघात झाल्यास आणि चालकाला दुर्दैवाने दुखापत झाल्यास शेतकरी कामगार पक्षातर्फे प्राथमिक उपचाराचा खर्च देण्यात येणार आहे. तसेच अधिकृत बैलगाडी स्पर्धांच्या ठिकाणी पूर्वसूचना दिल्यास शेकापची मोफत अॅम्ब्युलन्स सेवा दिली जाणार आहे. या निर्णयाचे सर्व बैलगाडी चालक-मालक आणि शौकिनांकडून स्वागत करण्यात येत असून, शेतकरी कामगार पक्षाला धन्यवाद देण्यात येत आहेत.
तुम्ही सांगा, अॅम्ब्युलन्स पाठवते!
ज्या ठिकाणी अधिकृत बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात येतात, त्याची पूर्वसूचना दिल्यास त्याठिकाणी शेकापची अॅम्ब्युलन्स मोफत सेवा देण्यासाठी उभी असेल, असे आश्वासन चित्रलेखा पाटील यांनी दिले आहे. या निर्णयाचे सर्व बैलगाडी चालक-मालक यांच्याकडून स्वागत करण्यात येत आहे.
बैलगाडी शर्यतीला एक परंपरा लाभली आहे. दुर्दैवाने शर्यतीदरम्यान अपघात होऊन या परंपरेला बाधा येऊ नये यासाठी आपण शेकापक्षाच्या माध्यमातून बैलगाडी शर्यतीदरम्यान शेकापक्षाची रुग्णवाहिका उभी करुन जेणे करुन दुर्दैवाने अपघात झालाच तर योग्य वेळेत उपचार मिळून होणारे नुकसान टाळता येईल. – चित्रलेखा पाटील, शेकाप महिला आघाडीप्रमुख
शेकापक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांच्यामुळेच बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठू शकली. आज या शर्यतीदरम्यान गाडीवानांना अपघात होऊन ते जखमी झाल्यास त्यांच्यावर उपचारासाठी चित्रलेखा पाटील यांनी केलेल्या घोषणेसाठी आम्ही धन्यवाद देतो. शर्यतीचा थरार अनुभवत असताना बांधवांची काळजी घेत हा शेकापचा आधार पण फार महत्त्वाचा ठरणार आहे, हा विश्वास आम्हाला वाटतो. – प्रतिक दळवी, बैलगाडी चालक, नांदगाव