निजामपुरात जनतेच्या तोंडचे पाणी पळाले

पूर्वीची योजना कोरडी, सुधारित योजना अपूर्ण

| माणगाव | प्रतिनिधी |

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निजामपूर ग्रामपंचायतीकडून होणारा पाणीपुरवठा गेले महिनाभरापासून कमी प्रमाणात सोडले जात असून, अनेक वेळा कधी तांत्रिक बिघाड तर कधी पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीत पाणी नसल्याने निजामपूरकरांना निमूटपणे पाणीटंचाईचे चटके सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे निजामपुरात जनतेच्या तोंडचे पाणी पळाले असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

निजामपूरला 40 वर्षांपूर्वी काळ नदीवरील विरोधा येथील विहिरीतून पाणीपुरवठा केला जात होता. वाढत्या शहरीकरणाबरोबरच नागरिकीकरण ही मोठ्या झपाट्याने वाढत असल्याने पाण्याचाही प्रश्‍न अधिक गंभीर होत चालला आहे. या शहराला मुबलक व स्वच्छ पाणी मिळावे म्हणून अनेक योजना राबविल्या. सध्या ही योजना कोरडी पडली. तर सुधारित पाणी योजना अर्धवट स्थितीत आहे. त्याचबरोबर नव्याने विळे-भागाड एमआयडीसीप्रमाणे रवाळजे धरणाच्या पाण्यावर नवीन 28 कोटी रुपयांची योजना मंजूर केली. या योजनेचे सप्टेंबर महिन्यात भूमीपूजन करण्यात आले. मात्र, अद्यापही या योजनेचे काम सुरु झाले नसल्याने एक ना धड, भाराभर चिंध्या अशी स्थिती झाली आहे.

दरम्यान, काळ नदीवर उभारलेला विरोधा येथील बंधारा एक महिन्यापूर्वी कोरडा पडला असून, याच नदीवर असणारे कोशिंबळे धरणही कोरडे पडल्याने निजामपूर व परिसरातील अनेक गावे वाड्यातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. ही काळ नदी पूर्ण कोरडी पडल्याने या पाणीटंचाईशी सामना कसा करावयाचा हा मोठा प्रश्‍न उभारला आहे.

सध्या पहूर येथील धरणाचे पाणी काळ नदी पात्रात सोडले असून, ते पाणी विहिरीत येईपर्यंत नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. माणगाव तालुक्यातील निजामपूर येथे सुमारे 16 हजार लोकसंख्या असून, गेल्या अनेक वर्षांपासून काळ नदीवर विंधनविहीर खोदून तेथून हाऊसपंपाद्वारे साठवण टाकीत पाणी सोडले जाते. त्या साठवण टाकीतून निजामपूर व परिसरातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. याच काळ नदीवर 45 वर्षांपूर्वी कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधला होता. या काळ नदीचे पाणी बंधार्‍यात साठवले जात होते. त्यामुळे नागरिकांना येथील धरणाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत होता. या बंधार्‍याची अनेक वर्षे दुरूस्ती न केल्याने हे पाणी वाहून गेले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून निजामपूरकरांच्या पदरी पाणीटंचाई पडत आहे. निजामपूर व परिसरातील चार महसूल गावे 10 वाड्या व निजामपूर बाजारपेठ असी मिळून 16 हजार लोकसंख्या आहे.

Exit mobile version