पहिल्याच पावसात युती सरकारचे पितळ उघडे

चुल्लू भर पानी मे मुंबई को डूबा दिया; काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची टिका

। मुंबई । प्रतिनिधी ।

सरकारी कार्यालयातील महिला व पुरुषांना घरी जाताना पावसाचा फटका बसु नये, म्हणून सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभराकरिता तहकूब करण्यात आले होते. मुंबई व उपनगरातील परिस्थिती पहिल्याच पावसाने अत्यंत भयावह झाली आहे. मुंबई व उपनगरातील अनेक भाग पाण्याने तुडुंब भरले. रेल्वे व रस्ते वाहतूक ठप्प होऊन मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. महानगरपालिका व रेल्वे प्रशासन यांच्यात कसलाही समन्वय नाही तर दुसरीकडे भ्रष्टाचारामुळे मुंबईकरांना शिंदे सरकारच्या पापाची फळे भोगावी लागत आहे. एकाच पावसात देशाची आर्थिक राजधानी पाण्याखाली जाते हे अत्यंत गंभीर आहे. पावसाने शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारचे पितळ उघडे पाडले असून महाभ्रष्टयुती सरकारने, चुल्लू भर पानी में मुंबई को डुबा दिया, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

मुंबई महानगर पालिकेचे कारभारी स्वतः मुख्यमंत्री आहेत पण चुकीच्या व्यक्तीच्या हातात राज्याची सुत्रे असल्याने मुंबई व महाराष्ट्राला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. महापालिकेच्या कार्यालयात दोन पालकमंत्र्यांची कार्यालये मुंबईकरांच्या कष्टाचे पैसे खाण्यासाठी काढली आहेत का? असा संतप्त सवाल विचारून स्वतःच्या अपयशाचे खापर मुख्यमंत्री पावसावर फोडत आहेत. मुंबईत झालेला पाऊस हा काही पहिल्यांदाच झालेला नाही. यापेक्षा मोठा पाऊस मुंबईत झालेला आहे पण अशी बिकट परिस्थिती झाली नव्हती. राजकारणापेक्षा मुंबईच्या कामात जास्त लक्ष घातले असते तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. मुंबईत कोट्यवधी रुपयांचे सिमेंट रस्ते बांधले पण त्यात खड्डे आहेत. कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागली, अटल सेतूला भेग्या पडल्या, हा महायुतीचा विकास आहे का? महापालिकेने मान्सूनपूर्व कामे केली. नालेसफाई केल, असा सरकारचा दावा आहे, तो या पावसाने खोटा ठरवला. मुख्यमंत्री ग्रीन कार्पेटवर उभे राहून नालेसफाईच्या पाहणीचे प्रदर्शन करत होते. त्यांच्या इव्हेंटबाजीचा पर्दाफाश झाला आहे. नालेसफाईत सुद्धा हातसफाई करुन खिसे भरण्याचेच काम झाले, म्हणून मुंबई तुंबली. एकाच पावसात विधिमंडळाचे अधिवेशन दिवसभरासाठी तहकूब करावे लागले, हे या सरकारचा गलथानपणा व निष्काळजीपणाचे उदाहरण आहे, असे नाना पटोले म्हणाले.

मुंबईत पावसाने जनजीवन ठप्प केले असताना राज्याच्या अनेक भागात मात्र अद्याप हजेरी लावलेली नाही. अनेक भागात दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यावर ओढवले आहे. पाणीटंचाईची अवस्था अत्यंत भयंकर आहे. अनेक गावांत पाण्यासाठी माता भगिनींना पाच पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. टँकरमाफिया आणि सरकारी अधिकारी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न अत्यंत गंभीर आहे. सरकार फक्त मंत्रालयातून आदेश देते पण प्रशासन खाली काहीच काम करत नाही, याकडे राज्य सरकार कधी लक्ष देणार, असे नाना पटोले यांनी सांगितले.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेला आहे. पोलिसांचा धाकच नसल्याने गुन्हेगार मोकाट आहेत. पुण्यातील पोर्श अपघातातून सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. वरळीत एका महिलेला भरधाव गाडीने चिरडले. ही कार शिंदे गटाच्या पदाधिकार्‍याची आहे. दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवल्याने एका निरपराध महिलेचा मृत्यू झाला. शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेचा माज आला आहे, मुख्यमंत्री म्हणतात कोणालाही पाठीशी घालणार नाही पण त्यांना कशाचेही गांभीर्य नाही. महाराष्ट्र सुरक्षित राहिला नाही हा संदेश देशात जात असून ते राज्याच्या हिताचे नाही. राज्यात अधिकारीही सुरक्षित राहिले नाहीत. पुण्यात वाहतूक शाखेच्या महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार घडला. महाराष्ट्र गुंडाराज व माफिया राज करुन ठेवले आहे. सरकारचा प्रशासनातील हस्तक्षेप, पैसे घेऊन बदल्या करणे अशा प्रकारांमुळे प्रशासन काम करत नाही. त्याचा परिणाम जनेतेला भोगावा लागत आहेत. सरकारला जाग आली नसेल तर जनताच आता त्यांना घरी पाठवेल, असंही नाना पटोले यांनी सांगितले.

Exit mobile version