वनविभागाच्या उदासीनतेमुळे तात्काळ उपाययोजना नाहीच
| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील वावेपंचतन हद्दीतील रस्त्यालगत असलेल्या जंगलात वणवा लागल्याने कित्येक लहान-मोठी झाडे जळून नष्ट झाली आहेत. येथील वनविभागाच्या दोन हेक्टर क्षेत्रातील डोंगराला लागलेल्या वणव्यात पशु-पक्षी, सरपटणार्या प्राण्यांसह जनावरांचा चारा नष्ट झाला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली असताना, वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याची बाब समोर आली आहे.
वावेपंचतन परिसरातील म्हाब्धा घाटातील वनविभागाच्या हद्दीत वणवा लागला. या वणव्यात जवळपास दोन ते तीन हेक्टर परिसर जळून खाक झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. वनविभागाच्या ढिसाळ कारभारामुळे जाळपट्टे काढले जात नाहीत, यामुळे डोंगरच्या डोंगर आणि वनविभागाच्या हद्दीतील झाडे या वणव्यांच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. येथे दिवसा लागलेल्या वणव्याकडे वनविभागाचे कर्मचारी फिरकलेच नाही.
गावांपासून निर्जन ठिकाण व क्वचितच रस्त्यावरून जाणारे प्रवासी वाहन असल्याने वणवा विझवण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. अशातच पाऊण तास उलटून गेला तरी वनविभागाचे अधिकारी वणव्या ठिकाणी पोहोचले नाहीत. – वैभव खोत, प्रवासी
वनविभागाचे दुर्लक्ष
शासन एकीकडे झाडे लावण्यासाठी प्रचंड अनुदान देते, यासाठी जनजागृती करीत वृक्ष लावगड करते आणि दुसरीकडे त्याची जोपासना करणारे वनविभागात काम करणारे कर्मचारी याकडे मोठे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे जंगलसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. शासन दरवर्षी वणवे लागू नये यासाठी मोठ्या प्रमाणात सूचना देते. जाळपट्टे काढण्यासाठी निधी देते, मात्र जाळपट्टे वेळेत आणि आवश्यक त्या ठिकाणी काढले जात नसल्याने वणवे लागण्याची प्रमाण वाढत आहे.