17 हजार विद्यार्थी देणार 18 फेब्रुवारीला परीक्षा
| रायगड | खास प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा दि.18 फेब्रुवारी रोजी होणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये इयत्ता पाचवीचे 10 हजार 352, तर इयत्ता आठवीचे 7 हजार 323 असे एकूण 17 हजार 675 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली होती. मात्र, रायगड जिल्ह्यामध्ये ही संख्या 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये तीन हजारांनी वाढली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पाचवीच्या दोन हजार आणि आठवीच्या एक हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दुसरी समाधानाची बाब म्हणजे, रायगड जिल्हा परिषदेच्या 855 शाळांमधील (पाचवी- 847, आठवी- 8) 3 हजार 286 विद्यार्थ्यांचे 7 लाख 42 हजार 925 रुपये एवढे परीक्षा शुल्क रायगड जिल्हा परिषद प्रशासन भरणार आहे. यावर्षीपासूनच विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, यापुढे दरवर्षी प्रशासनच परीक्षा शुल्क भरणार आहे. जिल्ह्यामध्ये इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 71 केंद्र आहेत, तर आठवीच्या परिषेसाठी 47 अशी एकूण 118 परीक्षा केंद्र असणार आहेत.
काही विद्यार्थ्यांच्या पालकांकडे फी भरण्याइतके पैस नसतात. कोणताही विद्यार्थी अशा कारणांनी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी रायगड जिल्हा परिषद या वर्षीपासून सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरणार आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून सदरचे परीक्षा शुल्क देण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिली. यामध्ये खुल्या प्रवर्गातील पाचवी- 1964 विद्यार्थी, आठवी- 185 विद्यार्थी, मागस/दिव्यांग प्रवर्गातील पाचवी- 987 विद्यार्थी, आठवी- 150 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचे अनुक्रमे 3 लाख 92 हजार 800, 37 हजार, 1 लाख 23 हजार 375 आणि 18 हजार 750 असे एकूण 7 लाख 42 हजार 925 रुपये परीशा शुल्काचा समावेश आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी रोजी विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे हॉल तिकीट शुक्रवार (दि.2) फेब्रुवारीपासून शाळेच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सर्व विद्यार्थी व पालकांनी शाळेच्या मुख्यध्यापकांकडून हॉल तिकीट प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहनही डॉ. बास्टेवाड यांनी केले आहे.