प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी मान्य
| उरण | प्रतिनिधी |
गेली अनेक दिवसापासून उरण ते नेरुळ व उरण ते बेलापूर या मार्गांवर रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात यावेत अशी मागणी प्रवाशी वर्ग, नागरिक, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संस्था सामाजिक संघटनानी केली होती. त्या मागणीला आता यश आले आहे. या निर्णयामुळे आता प्रवाशी वर्गांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. उरण ते नेरुळ व उरण ते बेलापूर या मार्गावर पहाटे पाच वाजल्यापासून रेल्वे सुरु करण्यात यावी व नेरुळ व बेलापूर येथून उरणला येण्यासाठी शेवटची रेल्वे रात्री अकरा वाजताची असावी अशी मागणी प्रवाशी वर्गांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या प्रगत आणि सर्वसमावेशक विकासासाठी सतत प्रयत्न करणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठपुराव्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी नेरुळ-उरण-नेरुळ (4 फेऱ्या), बेलापूर-उरण-बेलापूर (6 फेऱ्या) या अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. तसेच तरघर आणि गव्हाण येथे नवीन रेल्वे स्टेशन स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे मुंबई- नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे.
रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या समाधान वाटले. आनंद झाले. यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. परंतु, उरण वरून नेरुळ व बेलापूर जाण्यासाठी पहाटे लवकर रेल्वे फेऱ्या नाहीत, सुविधा नाहीत तसेच नेरुळ, बेलापूर येथून उरणला जाण्यासाठी रात्री उशिरा पर्यंत रेल्वे सेवा नाही. त्यामुळे प्रवाशी वर्गांचे खूप हाल होतात. आमची शासनाला विनंती आहे कि पहाटे 5 वाजता उरण हुन नेरुळ, बेलापूर जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरु व्हावे तसेच रात्री नेरुळ व बेलापूर रेल्वे स्टेशन वरून उरणला जाण्यासाठी शेवटची रेल्वे 11 वाजताची असावी अशी आम्हा प्रवाशांची मागणी आहे.
हर्षल म्हात्रे,
उरण, रेल्वे प्रवाशी







