। पिंपरी । वृत्तसंस्था ।
मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्याशी नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार संजय सुभाष वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. तर, उरणमधील संजोग रवींद्र पाटील यांचा अर्ज वैध ठरला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी (दि.18) एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. दुसर्या दिवशी एकाने तर पाचव्या दिवशी तीन अर्ज दाखल झाले. त्यात शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश होता. (दि.23) एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्यासह सहा तर (दि.24) एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीच्या माधवी जोशी यांच्यासह आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर, (दि.25) एप्रिल, शेवटच्या दिवशी 20 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
एकूण 38 अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची शुक्रवारी (दि.26) एप्रिल छाननी केली. काँग्रेसचा ए, बी फॉर्म नसल्याने गोपाळ तंतरपाळे यांचा तर राष्ट्रीय वाल्मिकी सेना पार्टीचे राजेंद्र मानसिंह छाजछिडक यांचाही अर्ज बाद झाला आहे. तिघांचे अर्ज बाद झाले असून 35 जणांचे वैध ठरले आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बंधारपाडा येथील संजय सुभाष वाघेरे आणि उरणमधील संजोग रवींद्र पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांचे नामसाधर्म्य असलेल्या दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यापैकी संजोग पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना खासदार बारणे यांचे समर्थक माऊली घोगरे सोबत होते. त्यांच्या खिशावर धनुष्यबाणाच्या चिन्हासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीरंग बारणे यांचेही छायाचित्र होते. बारणे यांनीच मतविभागणीसाठी ही खेळी खेळल्याचे दिसून आले. बारणे यांच्यासाठी ही लढत सोपी नसून संजोग यांना मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचे दिसते.