क्रिकेट जगतात भारताने रचला इतिहास

क्रिकेटच्या तीनही प्रकारात एक नंबर

| मोहाली | वृत्तसंस्था |

भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 गडी राखून पराभव करत आयसीसी एकदिवसीय गुण तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. भारत हा आता कसोटी आणि टी-20 पाठोपाठ एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील प्रथम क्रमांकावर आला आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा आता आशिया मधील पहिला संघ ठरला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचे 277 धावांचे आव्हान 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाला खाली खेचत एकदिवसीय संघांच्या गुण तालिकेमध्ये मध्ये अव्वल स्थान पटकावले. भारतीय संघाने 42 सामन्यात 4864 गुण अन्‌‍ 116 गुणांक दर मिळवत अव्वल स्थान गाठले. भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील ही अव्वल स्थानाची रस्सीखेच भारताने अवघ्या 1 गुणाने सध्या तरी जिंकली आहे. पाकिस्तानचे 29 सामन्यात 3231 गुण आणि 115 गुणांक दर आहेत. ते सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भारताने कसोटी आणि टी-20 मध्ये देखील संघ गुणतालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

Exit mobile version