भारताचा पहिली गोलदांजीचा निर्णय
। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याला सुरुवात झाली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. भारतीय संघ फलंदाजी अन् गोलंदाजीमध्ये समतोल आहे. फिरकी गोलंदाज फॉर्मात आहेत. पाकिस्तानचे फिरकी गोलंदाज फॉर्मात नाहीत, याचाच फायदा भारत घेऊ शकतो.
भारताची प्लेईंग 11 रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर.
पाकिस्तानची प्लेईंग 11 बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद शकील, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन अफ्रिदी, हारिस रौफ.
विश्वचषकाच्या रणांगणावर आजवर भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये सात सामने खेळवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्या सातपैकी सातही सामने भारतानं जिंकले आहेत. पण यंदाच्या विश्वचषकात भारताविरुद्धच्या अपयशाची मालिका खंडित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न राहिल. पाकिस्ताननं पहिल्या दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे नेदरलँड्स आणि श्रीलंकेला हरवून विश्वचषकात आपली ताकद दाखवून दिली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तर पाकिस्ताननं 345 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याची हिंमतही दाखवली. त्याचवेळी भारतानंही ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला हरवून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतलीय. भारतापाठोपाठ पाकिस्तान गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर धावांचा पाऊस पडू शकतो. फलंदाजांची येथे चांदीच होणार आहे. फलंदाजीला पोषक असणाऱ्या या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडणार आहे. गोलंदाजांनाही येथे थोडीफार मदत मिळण्याची शक्यता आहे. सामना पुढे जसा जाईल तशी फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता जास्त आहे. मोठे मैदान असल्यामुळे गोलंदाज न घाबरता चेंडू टाकू शकतील.